नवी दिल्ली: पाकिस्तानातून (Pakistani Women) बेकायदेशीर रित्या भारतात आलेल्या सीमा हैदरने (Seema Haider) आता राष्ट्रपतींकडे दया याचिका (President of India) दाखल केली आहे. याचिका करताना बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट, अभिनेता अक्षय कुमार यांच्यासारखे विदेशी नागरिक भारतात राहू शकतात मग मी का नाही, असा सवाल सीमा हैदर आणि तिच्या वकीलांनी उपस्थित केला आहे.
बेकायदेशीरपणे भारतात आलेल्या सीमा आणि सचिन यांची नुकतीच यूपी एसटीएसने चौकशी केली. यानंतर दोघेही आता आजारी पडल्याची माहिती समोर येत आहे. सीमा हैदरने शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे दयेचा अर्ज करत तिला तिच्या चार मुलं आणि पती सचिन मीना यांच्यासोबत ग्रेटर नोएडामध्ये राहण्याची परवानगी देण्याची विनंती केली.
‘मी सचिनसोबत लग्न केलं असून माझं त्याच्यावर खरं प्रेम आहे, त्यामुळे मी भारताची सून आहे. मी हिंदू धर्म स्वीकारला आहे. त्यामुळे मला भारताचं नागरिकत्व देण्यात यावं’, अशी मागणी सीमा हैदरने दया याचिकेद्वारे केली आहे.
सीमा हैदरनं याचिकेत नेमकं काय म्हटलंय?
सीमा हैदरच्या वकीलाने तिच्या याचिकेत म्हटलं आहे की, ”माननीय मॅडम, याचिकाकर्ता (सीमा हैदर) सचिन मीना यांच्यासोबत एक प्रेमळ पती, आई-वडीलांप्रमाणे प्रेम करणारे सासू-सासरे यांच्यासोबत शांती, प्रेम, आनंदाची भावना आढळली आहे, जी याचिकाकर्त्याला यापूर्वी कधीही जाणवली नव्हती. अर्जदार तुम्हाला विनंती करते की, तुम्ही याचिकाकर्त्यावर विश्वास ठेवावा आणि उच्चशिक्षित नसलेल्या महिलेवर दया दाखवावी.”
दया याचिकेत पुढे लिहिलं आहे की, ”तुम्ही दया दाखवली तर याचिकाकर्ता तिचे उर्वरित आयुष्य तिचा पती, चार अल्पवयीन मुले आणि वैवाहिक नातेवाइकांसह घालवेल. तुम्ही तिला काहीतरी बनवण्याची संधी दिली याबद्दल अर्जदार कृतज्ञ राहिल. यामुळे याचिकाकर्त्याला भारतात सन्मानानं आयुष्य जगता येईल.”