येमेनच्या पश्चिम किनाऱ्याजवळ लाल समुद्रात भारतीय ध्वज असलेल्या मालवाहू जहाजावर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर जहाज उलटून बुडाले. या जहाजावरील 13 भारतीय आणि एका येमेनी नागरिकासह सर्व 14 खलाशांची येमेनी तटरक्षक दलाने सुखरूप सुटका केली असून त्यांना वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. (Yemen Attack)
‘एमएसव्ही फैज नूरे ओलिया’ हे जहाज हुथींच्या ताब्यातील होदेदाह बंदराच्या दक्षिणेस सुमारे 13 सागरी मैलांवर असताना त्यावर क्षेपणास्त्र हल्ला झाला. हल्ल्यानंतर जहाज समुद्रात बुडाले. येमेनी राष्ट्रीय प्रतिकार दलाने तटरक्षक दल आणि नौदलाच्या संयुक्त मोहिमेद्वारे सर्व खलाशांना सुरक्षितपणे बाहेर काढल्याची माहिती दिली.
या घटनेनंतर भारताने जहाजावरील “विनाकारण” झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सरबानंद सोनोवाल यांनी जहाजावर क्षेपणास्त्र आदळल्याने ते उलटून बुडाल्याचे सांगितले. त्यांनी सागरी प्रशासन महासंचालकांना (DG Shipping/DGMA) संबंधित सर्व यंत्रणांशी समन्वय साधून भारतीय खलाशांच्या सुरक्षेसाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.
https://prahaar.in/2026/08/04/punjab-terror-plot-major-terror-plot-foiled-in-punjab-nine-individuals-including-four-minors-linked-to-the-isi-arrested/
सोनोवाल यांनी सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, संरक्षणरहित व्यापारी नौकेवरील हा हल्ला अत्यंत निषेधार्ह असून येमेनी तटरक्षक दलाने सर्व 14 खलाशांची सुरक्षित सुटका करून त्यांना मोखा बंदरात पोहोचवले आहे. (Indian Cargo Ship)
दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाने रियाध येथील भारतीय दूतावास परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून येमेनी अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्कात असल्याचे स्पष्ट केले आहे. बचावलेल्या भारतीय खलाशांना आवश्यक ती सर्व मदत पुरवली जात असल्याचेही मंत्रालयाने सांगितले.
भारताने लाल समुद्र परिसरात व्यापारी जहाजांवर वाढत्या हल्ल्यांबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय जलमार्गांमधील व्यापारी जहाजांना लक्ष्य करणे तातडीने थांबवावे आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांनुसार मुक्त व सुरक्षित नौकानयन पूर्ववत करावे, असे भारताने आपल्या निवेदनात म्हटले आहे. (Indian Sailors)
गेल्या काही महिन्यांत लाल समुद्र आणि बाब-अल-मंदेब सामुद्रधुनी परिसरात व्यापारी जहाजांवरील क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय खलाशांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला असून जागतिक व्यापार आणि ऊर्जा पुरवठ्यावरही त्याचे परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.