– ६० वर्षांपूर्वीचा रेल्वे पूल कोसळला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम
गुवाहाटी : ईशान्य भारतात मुसळधार पावसाने थैमान घातले असून आसाम आणि अरुणाचल प्रदेशात पूर व भूस्खलनामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. आसाममध्ये नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत असून अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. या महापुरामुळे सुमारे २२ हजार नागरिकांना घरे सोडावी लागली असून रस्ते, पूल, शेती आणि घरे जलमय झाली आहेत. (Assam Rain)
६० वर्षांपूर्वीचा रेल्वे पूल कोसळला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम :
आसाममधील धेमाजी जिल्ह्यातील अर्चीपाथर आणि सिमेन स्थानकांदरम्यानचा १९६५ मध्ये बांधलेला महत्त्वाचा रेल्वे पूल पुराच्या पाण्यात वाहून गेला. मुसळधार पाऊस आणि नदीकाठावरील तीव्र धूप यामुळे पुलाचा पाया कमकुवत झाल्याने ही दुर्घटना घडल्याची माहिती नॉर्थईस्ट फ्रंटियर रेल्वेने दिली आहे. धेमाजी जिल्ह्यात अवघ्या २४ तासांत ११० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली असून या दुर्घटनेमुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले असून काही मार्गांवरील सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. (Assam Rain)
https://prahaar.in/2026/06/30/maharashtra-monsoon-update-heavy-rain-in-mumbai-orange-alert-for-konkan-rain-warning-issued-for-23-districts-across-the-state-what-will-the-weather-be-like-over-the-next-3-days/
अमित शाहांनी घेतली परिस्थितीची माहिती :
पूरस्थिती गंभीर होत असल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. राज्यातील मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेत केंद्र सरकारकडून आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. (Assam Rain)
अरुणाचलमध्ये १२ जिल्ह्यांचा संपर्क तुटला :
दरम्यान, शेजारील अरुणाचल प्रदेशातही मुसळधार पावसामुळे भीषण पूर आणि भूस्खलनाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक रस्ते आणि पूल वाहून गेल्याने राज्यातील १२ जिल्ह्यांचा बाहेरील जगाशी संपर्क तुटला आहे. लोअर दिबांग व्हॅली जिल्ह्यातील सिसिरी नदीच्या पात्रात अडकलेल्या चार जणांची भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने सुखरूप सुटका करण्यात आली. प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे. (Assam Rain)
https://prahaar.in/2026/06/30/leakage-at-modak-sagar-dams-access-passage-rubber-seal-of-automatic-gate-worn-out/
देशभरात जून महिना ठरला १४६ वर्षांतील सर्वाधिक कोरड्यांपैकी एक :
एकीकडे ईशान्य भारतात पावसाने हाहाकार माजवला असताना, देशाच्या इतर अनेक भागांत मात्र मान्सूनची प्रतीक्षा कायम आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, यंदाचा जून महिना गेल्या १४६ वर्षांतील सर्वाधिक कोरड्या जून महिन्यांपैकी एक ठरला आहे. देशभरात जूनमध्ये सरासरीपेक्षा ४० टक्के कमी पाऊस झाला, तर मध्य भारतात ही तूट तब्बल ६० टक्क्यांपर्यंत पोहोचली. मध्य प्रदेश, गुजरात आणि उत्तर प्रदेशातील अनेक भागांत मान्सूनचा वेग मंदावल्याने शेतीवर मोठा परिणाम झाला असून शेतकरी चिंतेत आहेत. (Assam Rain)
हवामान तज्ज्ञांच्या मते, पुढील काही दिवसांत मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. मात्र ईशान्य भारतात अतिवृष्टीचा धोका कायम असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. (Assam Rain)