नवे चंदीगड : इंडियन प्रीमियर लीगच्या धामधुमीनंतर आता भारतीय क्रिकेट पुन्हा एकदा कसोटी क्रिकेटच्या रंगमंचावर परतत आहे. ६ जूनपासून मुल्लानपूर येथील महाराजा यादविंद्रसिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात एकमेव कसोटी सामना खेळवला जाणार आहे. हा सामना अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरणार आहे. कारण मुल्लानपूर हे भारतातील ३१ वे कसोटी मैदान ठरणार असून येथे प्रथमच पुरुषांची आंतरराष्ट्रीय कसोटी खेळली जाणार आहे.भारतीय संघाचा नवा कसोटी कर्णधार शुभमन गिल याच्यासाठीही हा सामना विशेष महत्त्वाचा आहे. पंजाबचा सुपुत्र असलेल्या गिलला आपल्या घरच्या मैदानावर प्रथमच कसोटी संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर पंजाबचाच वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रार यालाही संघात स्थान मिळाल्याने स्थानिक क्रिकेटप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता आहे.भारत सध्या आयसीसी कसोटी क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असला तरी अलीकडील काळात संघाची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर झालेली कसोटी मालिका भारताने गमावली होती. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्धचा सामना केवळ विजयासाठीच नव्हे, तर आगामी आव्हानांसाठी संघबांधणी करण्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचा मानला जात आहे.
मुल्लानपूरच्या नव्या कसोटी मैदानावर इतिहास रचण्याची संधी दोन्ही संघांसमोर असली, तरी निकालापेक्षा भारतीय क्रिकेटच्या पुढील पिढीची चाचणी आणि भविष्यातील संघरचनेची दिशा ठरवणारा हा सामना अधिक महत्त्वाचा ठरणार आहे. भारत विजयाचा प्रबळ दावेदार असला, तरी युवा खेळाडूंची कामगिरी आणि गिलच्या नेतृत्वाखालील संघाचा दृष्टिकोन हेच या कसोटीचे खरे आकर्षण असणार आहे.
https://prahaar.in/2026/06/05/ind-vs-afg-test-at-what-position-will-sai-sudarshan-bat-in-the-test-match-against-afghanistan-gambhir-gave-information/
साई सुदर्शनवर गंभीरांचा ठाम विश्वासा
एकमेव कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. युवा फलंदाज साई सुदर्शन याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे गंभीर यांनी स्पष्ट केले. गंभीर म्हणाले की, साई सुदर्शनला अद्याप कसोटी क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी पुरेशा संधी मिळालेल्या नाहीत. इंग्लंडसारख्या कठीण परिस्थितीत त्याने कारकीर्द सुरू केली असून केवळ काही सामन्यांच्या आधारे त्याचे मूल्यमापन करणे योग्य ठरणार नाही. सुदर्शनने आतापर्यंत सहा कसोटी सामन्यांतील अकरा डावांत ३०२ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी २७.४५ असून दोन अर्धशतके त्याच्या नावावर आहेत. सर्वोच्च धावसंख्या ८७ अशी आहे. मात्र यंदाच्या आयपीएलमध्ये त्याने विलक्षण सातत्य राखत १७ डावांत ७२२ धावा केल्या. त्यामध्ये एक शतक आणि आठ अर्धशतकांचा समावेश होता. तसेच “साईला न्याय्य संधी मिळाली नाही. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये फार कमी सामने खेळले आहेत. इंग्लंडमध्ये सुरुवात करणे कोणत्याही फलंदाजासाठी सोपे नसते. आयपीएलमध्ये त्याने शानदार कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याला सातत्याने संधी देणे आवश्यक आहे.”
युवा खेळाडूंवर सर्वांच्या नजरा
या सामन्यात भारताच्या काही नवोदित खेळाडूंना स्वतःला सिद्ध करण्याची मोठी संधी मिळणार आहे. विदर्भचा फिरकीपटू हर्ष दुबे, राजस्थानचा अष्टपैलू मानव सुथार आणि पंजाबचा वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रार यांना प्रथमच राष्ट्रीय संघात स्थान मिळाले आहे. हर्ष दुबेने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २७ सामन्यांत १३३ बळी घेतले असून फलंदाजीतही एक हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. मानव सुथारने २९ सामन्यांत १२९ बळी घेतले असून तोही उपयुक्त फलंदाज आहे. रविंद्र जाडेजाला विश्रांती दिल्याने या दोघांपैकी कोणाला संधी मिळते, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.
https://prahaar.in/2026/06/05/fifa-world-cup-2026-four-time-world-champion-italy-out-five-legendary-teams-out-of-the-world-cup/
भारताचा अनुभव अफगाणिस्तानवर भारी?
२०१८ मध्ये बंगळुरूमध्ये झालेल्या पहिल्या कसोटीत भारताने अफगाणिस्तानचा अवघ्या दोन दिवसांत पराभव केला होता. त्यानंतर भारताने ६७ कसोटी सामने खेळले, तर अफगाणिस्तानला केवळ ११ सामने खेळण्याची संधी मिळाली. त्यामुळे अनुभवाच्या बाबतीत भारताची बाजू अत्यंत मजबूत आहे. अफगाणिस्तानचे नेतृत्व हशमतुल्लाह शाहीदी करणार असून रहमत शाह, रहमानुल्लाह गुरबाज आणि अझमतुल्लाह ओमरझाई यांच्याकडून संघाला मोठ्या अपेक्षा असतील. मात्र राशिद खान आणि मोहम्मद नबी यांसारखे प्रमुख खेळाडू संघात नसल्याने अफगाणिस्तानची ताकद काहीशी कमी झालेली दिसते.
https://prahaar.in/2026/06/05/ebola-effect-on-world-cup/
उष्णतेचेही मोठे आव्हान
मुळ्लानपूरमध्ये सामन्यादरम्यान तापमान ३९ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही संघांच्या खेळाडूंची शारीरिक क्षमता आणि सहनशक्तीची कसोटी लागणार आहे. आयपीएलनंतर लगेचच कसोटी क्रिकेट खेळताना खेळाडूंना या उष्णतेचा मोठा सामना करावा लागू शकतो.
भारत प्रबळ दावेदार
यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, ऋषभ पंत, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांसारख्या अनुभवी खेळाडूंसह भारताचा संघ संतुलित दिसत आहे. दुसरीकडे अफगाणिस्तानचा कसोटी अनुभव मर्यादित असल्याने भारत या सामन्यात स्पष्टपणे प्रबळ दावेदार मानला जात आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार भारत पहिल्या डावात ४०० हून अधिक धावा उभारू शकतो. मोहम्मद सिराज हा सामनावीर ठरण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून यशस्वी जयस्वालकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.