ज्ञानी से कहिये कहा
ज्ञानी से कहिये कहा, कहत कबीर लजाय
अंधे आगे नाचते, कळा अकारथ जाय
कबीर हे अतिशय सडेतोड आणि स्पष्ट वक्ते संत होते. दंभिकपणाचा त्यांना अतिशय तिरस्कार होता. आपले विचार ते अतिशय निर्भीडपणे कडक भाषेत मांडीत असत. कर्मकांड, अंधश्रद्धा यांच्या जंजाळात अडकलेल्या लोकांना कबिरांनी ज्ञानाच्या डोळस मार्गावर आणण्याचे सर्व प्रयत्न केले. सर्वसामान्य दिशा हरवलेल्या लोकांचे प्रबोधन व्हावे म्हणून ते आयुष्यभर झटले. आपल्या सरळ, निर्मळ, शुद्ध तत्त्वज्ञानाचे सार लोकांपर्यंत पोहोचविण्यात त्यांनी सातत्याने प्रयत्न केला.
https://prahaar.in/2026/05/29/government-should-purchase-the-historic-savarkar-sadan-in-dadar/
व्यर्थ धार्मिक विधी वा कर्मकांड लोकांना भुलविणाऱ्या आणि त्यांचे शोषण करणाऱ्या लोकांच्या बाबतीत कबिरांनी कडक शब्दांत प्रहार केले आहेत. या रचनेत कबीर म्हणतात, शास्त्राचा अभ्यास केलेले पुस्तकी, पोकळ पंडित आणि कुराणाचा अभ्यास केलेले मुल्ला-मौलवी हे केवळ वाचलेल्या ग्रंथांच्या वा ऐकीव माहितीच्या आधारे आपला वरवरचा पुस्तकी अनुभव कथन करतात. परमेश्वरी शक्तीच्या अनुभवापासून ते कित्येक योजने दूर असतात. परमेश्वराच्या परम अस्तित्वाची त्यांना जराही जाणीव नसते. अशा पोकळ पंडितांच्या विवेचनाच्या बाबतीत काही बोलायलाही लज्जास्पद वाटते. अर्धवट अभ्यास करणाऱ्याचे ज्ञानही मर्यादित आणि अनुभवही मर्यादित. त्याचे सारे ध्यान आपल्या उदरनिर्वाह करण्याकडे. असे पोटार्थी लोक अध्यात्माचे तत्त्व कसे उलगडून दाखविणार? त्यांचे ज्ञान आणि भक्तीही कोरडी. कबीर सत्याचरणी होते. खोटेपणाची त्यांना प्रचंड चीड होती. नेहमी सत्याची कास धरावी हे सांगताना ते म्हणतात,
कबीर झूठ न बोलिये, जब लग पार बसाय
अहो कबीरा, साच कहूँ, आवागमन नसाय
https://prahaar.in/2026/05/29/hardik-pandya-hardik-pandyas-captaincy-is-in-danger-managements-patience-is-running-out/
तात्पर्य, माणसाचा भरोसा नाही. एक क्षणात जीव शरीर सोडून जाईल. पुन्हा संधी मिळणार नाही. म्हणून सत्य आचरावे. हिंदीत संत कबीर आणि
मराठीत संत तुकाराम यांनी सामाजिक जाणिवेचा पाया घातला. लोकांना कर्मकांड, उपासतापास, नवस, पशुबळी या अंधश्रद्धांपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला.
___डॉ . देविदास पोटे