टिटवाळा : मध्य रेल्वेच्या (Central Railway) खडवली (Khadavli) ते टिटवाळा (Titwala) स्थानकांदरम्यान रविवारी (२४ मे) पहाटे सुमारे ४.३० वाजता झालेल्या पावसामुळे वीजपुरवठा (Power Supply) खंडित झाला. अचानक झालेल्या पॉवर कटमुळे कसारा ते कल्याण (Kalyan) दरम्यानची रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आणि अनेक लोकल (Local) गाड्या तात्पुरत्या स्थानकावर थांबवण्यात आल्या. यामुळे सकाळच्या शिफ्टला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
https://prahaar.in/2026/05/23/seven-members-of-the-same-family-suffer-food-poisoning-after-consuming-packaged-aamras/
पॉवर कटमुळे कसारा-सीएसएमटी (Kasara-CSMT) ही पहाटे ३.५१ वाजता सुटणारी लोकल खडवली स्थानकात बराच वेळ थांबवण्यात आली. त्यानंतर टिटवाळा, अंबिवली, शहाड आणि परिसरातील प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. कसारा ते कल्याण दरम्यानची संपूर्ण लोकल सेवा प्रभावित झाली होती. मात्र, कल्याणच्या पुढील मार्गावरील गाड्या वेळेवर धावत असल्याने अनेक प्रवाशांनी रस्तेमार्गे कल्याण गाठण्याचा पर्याय निवडला.
दरम्यान, रेल्वे सेवा बंद असल्याने काही प्रवाशांनी रिक्षाने प्रवास करण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही ठिकाणी रिक्षाचालकांकडून वाढीव भाडे आकारण्यात आल्याची तक्रार प्रवाशांनी केली. जवळपास एक तास कोणतीही गाडी न आल्याने स्थानकांवर प्रवाशांचा संताप वाढला होता.
https://prahaar.in/2026/05/23/district-collector-issues-notice-to-shivraj-motegaonkar-unauthorized-construction-row-heats-up/
टिटवाळा-सीएसएमटी ही पहाटे ४.३२ वाजताची लोकल गेल्यानंतर रेल्वे वाहतूक पूर्णपणे खोळंबली. अखेर सकाळी सुमारे ५.४५ वाजता वीजपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर रेल्वे सेवा सुरू होणार असल्याची घोषणा करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात सकाळी ६ नंतरच रेल्वे वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली.
वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर सर्वप्रथम नांदिग्राम एक्स्प्रेस (Nandigram Express – 11002) टिटवाळा स्थानकात थांबवण्यात आली. या गाडीत चढत अनेक प्रवाशांनी कल्याणपर्यंत प्रवास केला आणि तेथून पुढील मार्ग गाठला. त्यानंतर लोकल गाड्यांची वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आली.
https://prahaar.in/2026/05/23/administration-deals-a-major-blow-to-laturs-tuition-area-orders-issued-to-shut-down-unauthorized-operations/
पहाटे झालेल्या या प्रकारामुळे सकाळच्या शिफ्टला जाणारे कर्मचारी, कामानिमित्त बाहेर पडलेले नागरिक तसेच गावाकडे जाणारे प्रवासी यांची मोठी गैरसोय झाली. सुदैवाने हा प्रकार रविवारी घडल्याने नेहमीच्या तुलनेत प्रवाशांची संख्या कमी होती. मात्र, सकाळच्या ड्युटीवर जाणाऱ्या आणि अत्यावश्यक कामांसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या बिघाडाचा मोठा फटका बसला. रेल्वे वाहतूक पूर्ववत झाल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.