चेन्नई : महाराष्ट्राचा अडथळा शर्यतपटू (हर्डलर) आणि राष्ट्रीय विक्रमवीर तेजस शिर्से याला ‘स्ट्रेस फ्रॅक्चर’च्या गंभीर दुखापतीमुळे आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. ग्लासगो येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत १३.७६ सेकंदांची नोंद करत १९६६ नंतर अंतिम फेरीत पोहोचणारा तो पहिला भारतीय ठरला होता. मात्र, अंतिम सामन्यात दुखापतीसह धावल्यामुळे त्याला शेवटच्या स्थानावर समाधान मानावे लागले. सोशल मीडियावर माहिती देताना तेजसने सांगितले की, तो पायात दोन स्ट्रेस फ्रॅक्चर असताना राष्ट्रकुलच्या अंतिम फेरीत उतरला होता. गेल्या १२ महिन्यांपासून तो विविध दुखापतींशी झुंज देत आहे.
https://prahaar.in/2026/08/04/oneplus-16-launching-soon-8gb-ram-model-set-to-make-a-comeback-price-and-features-leaked/
इन्स्टाग्राम पोस्टमध्ये भावना व्यक्त करताना तेजस म्हणाला, “मला वाटले होते की माझ्या हातात पदक असेल आणि जिंकण्यासाठी माझी पूर्ण तयारी होती; पण दुखापतीमुळे आता माझ्या हातात एमआरआय रिपोर्ट आहेत. स्वप्न अपूर्ण राहिले आणि हा हंगाम इथेच संपला. आशियाई स्पर्धेसाठी पात्र ठरूनही मला तिथे खेळता येणार नाही, हे सर्वाधिक वेदनादायी आहे. सध्या तरी माझ्याकडे पुनरागमनाची कोणतीही कथा नाही, तर फक्त वेदना आणि प्रश्न आहेत.”
https://prahaar.in/2026/08/04/eknath-shinde-an-elected-representative-is-not-the-master-of-power-but-a-servant-of-the-people-eknath-shinde-shares-his-mantra-of-development-public-service-and-leadership-with/
अंतिम शर्यतीतून माघार घेण्याचा पर्याय उपलब्ध असतानाही धावण्याचा निर्णय का घेतला, यावर बोलताना तो म्हणाला, “वॉर्म-अप दरम्यान शरीराने काहीतरी चुकीचे असल्याचे संकेत दिले होते. पण अनेकदा आपण या क्षणासाठी इतकी वर्षे मेहनत केलेली असते की, शर्यत सुरू होण्यापूर्वी मागे हटणे मनाला पटत नाही, म्हणूनच मी धावलो. खेळाने मला शिकवले आहे की आपली खरी ओळख ही फक्त आपल्या सर्वात वेगवान शर्यतीवर अवलंबून नसते. या कठीण टप्प्यातून बाहेर पडून मी पुन्हा नक्की पुनरागमन करेन.”