मुंबई : राज्यात पावसाने पुन्हा एकदा अत्यंत रौद्र रूप धारण केले असून आगामी दोन दिवस विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या माहितीनुसार, विशेषतः विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता प्रशासनाने एकूण १० जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या पातळ्यांवर ‘अलर्ट’ जारी केला असून नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
विदर्भातील ६ जिल्ह्यांत पाऊस तांडव करणार
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, विदर्भात पुढील २४ तासांत ढगफुटीसदृश पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यांसाठी अतिमुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तर वाशिम, अकोला, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला असून नागपूर व बुलढाणा जिल्ह्यांत ‘यलो अलर्ट’ राहण्याचा अंदाज आहे. १ ऑगस्टपासून विदर्भातील पावसाचा जोर हळूहळू ओसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
https://prahaar.in/2026/07/30/chandrashekhar-bawankule-abhijit-dipke-should-reveal-the-names-of-the-bjp-leaders-who-issued-threats/
जळगाव जिल्ह्याला धोक्याचा इशारा
उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने थेट ‘रेड अलर्ट’ घोषित केला आहे. जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची दाट शक्यता आहे. सखल भागांमध्ये पाणी साचून पूरस्थिती निर्माण होऊ शकते, त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. तसेच, विजांचा कडकडाट सुरू असताना शेतकरी बांधवांनी झाडांखाली किंवा विजेच्या खांबांजवळ न थांबता सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
४० ते ४५ किमी वेगाने वारे
कोकण किनारपट्टीवरही पुढील काही दिवस जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्या रत्नगिरी जिल्ह्याला पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. मात्र, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वातावरणीय बदलांमुळे येथे सध्या पावसापेक्षा सोसाट्याच्या वाऱ्याचा प्रभाव अधिक दिसून येत आहे. किनारपट्टीच्या भागात प्रतितास ४० ते ४५ किलोमीटर या वेगाने वारे वाहत असून, यामुळे समुद्रात उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे.
गोंदियात भीषण चक्रीवादळाचा तडाखा
हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ‘वडेगाव बांध’ परिसरात भीषण नैसर्गिक आपत्ती ओढवली. अचानक आलेल्या तीव्र वादळी वाऱ्याने परिसरात मोठा धुमाकूळ घातला. वादळाचा वेग इतका प्रचंड होता की अनेक घरांची छपरे आणि पत्रे हवेत उडून गेली. तसेच झाडे आणि विजेचे खांब उन्मळून पडल्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. या दुर्घटनेत ८ जण जखमी झाले असून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.