भाजपकडून २२ जुलै ते ५ ऑगस्टदरम्यान ‘सेवा यज्ञ’; महारक्तदान शिबिरांसह विविध उपक्रमांचे आयोजन
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या वाढदिवसाचे (Birthday) औचित्य साधून भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यभरात व्यापक सामाजिक उपक्रम आणि ‘सेवा यज्ञ’ राबवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देणारे विधेयक संमत केल्याबद्दल भाजप महिला मोर्चाच्या वतीने संघटनात्मक ७२ विभागांमध्ये ‘देवाभाऊ कृषी माऊली सोहळा’ आयोजित केला जाणार आहे. याचबरोबर २२ जुलै ते ५ ऑगस्ट या कालावधीत ‘राजस्व अभियान’ आणि ‘महारक्तदान महाभियान’ राबवून सर्वसामान्यांच्या विविध समस्या सोडवण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी दिली.
https://prahaar.in/2026/07/21/ajit-pawar-first-list-of-loan-waivers-on-ajit-pawars-birthday-chief-minister-devendra-fadnavis/
भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या मार्गदर्शनाखाली ‘देवाभाऊ कृषी माऊली सोहळा’ २२ ते २७ जुलैदरम्यान टप्प्याटप्प्याने संपूर्ण महाराष्ट्रात पार पडणार आहे. २२ जुलै रोजी विदर्भ, २३ जुलैला मराठवाडा, २४ जुलैला पश्चिम महाराष्ट्र, २६ जुलै रोजी ठाणे-कोकण आणि २७ जुलै रोजी उत्तर महाराष्ट्रात या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शहरी भागातील महिलांसाठी टेरेस व बालकनी गार्डनिंग तसेच हायड्रोपोनिक्स शेतीचे प्रशिक्षण देणारे विशेष किट वितरीत केले जाईल. तर ग्रामीण भागात विशेषतः एकल, विधवा व शेतमजूर महिलांना एकत्र आणून सोइल टेस्टिंगच्या (मृदा परीक्षण) मार्गदर्शनासह सेंद्रिय खत व बियाण्यांचे ‘कृषी किट’ बायोडिग्रॅडेबल बॅग्सद्वारे वितरित केले जाणार आहे. महिलांना शेतकरी म्हणून ओळख देणाऱ्या ऐतिहासिक निर्णयानंतर हा सोहळा आयोजित करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
कोणकोणते उपक्रम राबवणार?
दुसरीकडे, भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी पक्षाच्या सेवा सप्ताहाबाबत माहिती दिली. २२ जुलै ते ५ ऑगस्ट दरम्यान शासकीय व पक्ष पातळीवर ‘राजस्व अभियान’ राबवले जाईल. यामध्ये ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना’, सातबाऱ्यावर नाव नोंदणी व दुरुस्ती, सातबारा फोड करणे, तसेच दिव्यांग, युवक व शेतकरी महिलांच्या अडचणी सोडवण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन केले जाईल. याशिवाय १९ ते २३ जुलैदरम्यान राज्यभरात महारक्तदान अभियान राबवून सुमारे १ लाख रक्तदात्यांचे योगदान मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.