Home ब्रेकिंग न्यूज Ashadhi Wari 2026 : भक्तीचा उत्सव रंगला! पुण्यात संतांच्या पालखीचे उत्साहात स्वागत

Ashadhi Wari 2026 : भक्तीचा उत्सव रंगला! पुण्यात संतांच्या पालखीचे उत्साहात स्वागत

0
Ashadhi Wari 2026 : भक्तीचा उत्सव रंगला! पुण्यात संतांच्या पालखीचे उत्साहात स्वागत
Palkhi Mukkam Pune

पुणे : “देवाचिये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्ती चारी साधियेल्या…” या हरिपाठातील ओळींचा प्रत्यय देणारे भक्तिमय वातावरण गुरुवारी (९ जुलै) पुण्यात अनुभवायला मिळाले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज (Sant Dnyaneshwar Maharaj) आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) यांच्या पालखी सोहळ्याचे (Palkhi Procession) पुण्यात उत्साहात आगमन झाले. “ज्ञानोबा माऊली, तुकाराम”च्या अखंड नामघोषाने (Chanting) आणि टाळ-मृदुंगाच्या निनादाने संपूर्ण शहर भक्तिरसात रंगून गेले.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानेही या दिवशी विश्रांती घेतल्याने लाखो वारकरी (Warkari devotees) आणि पुणेकरांनी पालखीचे जल्लोषात स्वागत केले. फुलांची उधळण, दिंड्यांचा (Dindi) शिस्तबद्ध प्रवास आणि विठ्ठलनामाच्या गजराने शहरातील प्रमुख रस्ते भक्तीमय झाले.

रात्री ९:२० वाजता संत तुकाराम महाराजांची पालखी नाना पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिरात, तर १०:१५ वाजता संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात मुक्कामी (Halt) पोहोचली.

यंदा आळंदीतील इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे अनेक दिंड्या नियोजित वेळेपूर्वी पुण्यात दाखल झाल्या होत्या. त्यामुळे दिंड्यांची संख्या कायम असली तरी पालख्यांसोबत चालणाऱ्या वारकऱ्यांची गर्दी तुलनेने काहीशी कमी दिसली. पोलिसांच्या माहितीनुसार, यंदा पुण्यात ८ लाखांहून अधिक वारकरी दाखल झाले. विशेष म्हणजे, दोन्ही पालख्या गेल्या वर्षाच्या तुलनेत जवळपास एक तास आधी पुण्यात पोहोचल्या.

आज, शुक्रवारी (१० जुलै) दोन्ही पालख्या पुण्यात मुक्कामी असतील. त्यानंतर शनिवारी (११ जुलै) पहाटे पंढरपूरच्या (Pandharpur) दिशेने पुढील प्रवास सुरू होणार आहे.

पालखी स्वागतासाठी (Welcome) शहरातील प्रमुख मार्ग आकर्षक रांगोळ्या, फुलांची सजावट आणि भक्तिमय संदेशांनी सजले होते. गुडलक चौक, संत तुकाराम पादुका चौक आणि संत ज्ञानेश्वर पादुका चौक येथे शंखनादाने वातावरण अधिक मंगलमय झाले. सायंकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली होती, मात्र पालखी शहरात दाखल होताच पावसाने पुन्हा विश्रांती घेतल्याने वारकऱ्यांचा प्रवास सुरळीत झाला.

“हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा; पुण्याची गणना कोण करी…” या हरिपाठातील ओळींप्रमाणे विठ्ठलनामाचा अखंड गजर करत वारकरी पुढे सरकत होते. पुणेकरांनीही रस्त्यांच्या दुतर्फा उभे राहून पुष्पवृष्टी करत या भक्तिसोहळ्याचे स्वागत केले.

https://prahaar.in/2026/07/09/clouds-over-the-bay-of-bengal-have-cleared-and-the-intensity-of-rainfall-in-the-state-is-set-to-subside-however-an-orange-alert-has-been-issued-for-the-ghat-areas-of-pune-and-satara/

संत तुकाराम महाराजांची पालखी सायंकाळी ५:१० वाजता संचेती चौकात दाखल झाली. दर्शनासाठी मोठी गर्दी झाली असून अनेकांनी हा क्षण आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपला. त्यानंतर सुमारे सव्वातासाने, ६:३५ वाजता फुलांनी सजलेला संत ज्ञानेश्वर महाराजांचा रथ संचेती चौकात पोहोचला. पादुकांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली.

संचेती चौक, फर्ग्युसन रस्ता, ज्ञानेश्वर पादुका चौक, खंडोजीबाबा चौक, कुमठेकर रस्ता आणि लक्ष्मी रस्ता या मार्गांवरून पालखी पुढे मार्गस्थ झाली. विविध सामाजिक संस्था, मंडळे, खासगी कार्यालये आणि स्वयंसेवकांकडून वारकऱ्यांसाठी अल्पोपहार (Refreshments) व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. महिला, तरुण-तरुणी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने या वारीत सहभागी झाले.

नाना पेठ आणि भवानी पेठ येथील मंदिरांमध्ये भाविकांसाठी संतांच्या पादुकांच्या दर्शनाची व्यवस्था करण्यात आली असून, भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन परिसरात कडक पोलीस बंदोबस्त (Police Security) तैनात करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here