Mumbai : नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी झालेल्या एका भीषण अपघातात पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्राप्त माहितीनुसार, राणेनगर ते इंदिरानगर दरम्यान महामार्गावरील उड्डाणपुलाचे रुंदीकरण आणि दुरुस्तीचे काम सुरू आहे. या कामावर मध्यप्रदेशातील पुरानाखेडा येथील रहिवासी नन्नेभाई भगवानदास आदिवासी (वय ५६) आणि त्यांच्या पत्नी राधारानी नन्नेभाई आदिवासी (वय ५५) हे दोघे मजूर म्हणून कार्यरत होते.
https://prahaar.in/2026/06/27/afghanistan-shaken-by-earthquake-strong-tremors-measuring-6-2-on-the-richter-scale/
शुक्रवारी दि. २६ जून रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास हे दाम्पत्य आपली कामाची पाळी संपवून रस्ता ओलांडत होते. दरम्यान, पाथर्डी फाट्याकडून द्वारकाच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या एमएच १५ एचएम २१५३ क्रमांकाच्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दोघेही रस्त्यावर फेकले जाऊन गंभीर जखमी झाले. घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि सहकाऱ्यांनी तातडीने त्यांना उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.मात्र, उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री नन्नेभाई आदिवासी यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर शनिवारी पहाटे राधारानी आदिवासी यांनीही उपचारांना प्रतिसाद न देता अखेरचा श्वास घेतला.
https://prahaar.in/2026/06/27/whether-elderly-or-a-student-the-ncmc-card-will-be-mandatory-for-availing-concessions-starting-august-1st/
या दुर्दैवी घटनेत एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या मुलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.या प्रकरणी अंबड पोलिसांनी अपघातग्रस्त कार ताब्यात घेतली असून, संबंधित कार चालकाविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा या निमित्ताने ऐरणीवर आला आहे. सध्या सहाय्यक पोलीस निरीक्षक हारून शेख हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. पोलीस या घटनेतील कार चालकाचा शोध घेत असून, अपघाताच्या वेळी नेमकी कोणाची चूक होती, याचा तपास केला जात आहे.