भोपाळ : मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या एकमेव उमेदवार असलेल्या मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळला आहे. हैदराबाद येथील न्यायालयात प्रलंबित असलेल्या एका फौजदारी खटल्याची माहिती अर्जात नमूद न केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. भाजपकडून यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नटराजन यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तसेच ९ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, निर्धारित मुदतीत कोणतेही उत्तर प्राप्त झाले नाही. त्यानंतर करण्यात आलेल्या चौकशीत अर्जामध्ये आवश्यक माहिती लपविण्यात आल्याचे आढळून आल्याने तांत्रिक कारणास्तव त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला.
https://prahaar.in/2026/06/09/nia-raids-18-places-to-find-terrorists-helpers/
या निर्णयामुळे मध्य प्रदेशातील राज्यसभेच्या जागेसाठीच्या निवडणूक प्रक्रियेत काँग्रेस पक्षाची स्पर्धा आता संपुष्टात आली आहे. या कारवाईवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत विरोधी पक्षनेते उमंग सिंघार यांनी याला “लोकशाहीची हत्या” असे संबोधले. कायदे आणि नियमांकडे दुर्लक्ष करून उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. सिंघार म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार उमेदवारांनी स्वतःविरुद्ध दाखल असलेल्या प्रकरणांची माहिती देणे बंधनकारक असले, तरी केवळ कारणे दाखवा नोटीस देण्यात आलेल्या प्रकरणाच्या आधारे अशी कारवाई करणे नियमबाह्य आहे. या निर्णयाविरोधात काँग्रेस न्यायालयात दाद मागणार असून हा मुद्दा जनतेसमोरही मांडण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.