मुंबई (Aamir Khan’s Third Marriage) : बॉलिवूडचा ‘PK’ आमिर खान (Aamir Khan) तिसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा रंगली आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता उधाण आले असून आमिर खानच्या आयुष्यात नव्या पर्वाची सुरुवात होणार असल्याचं बोललं जात आहे. खासगी आयुष्याबाबत नेहमीच गोपनीयता राखणारा आमिर आता तिसऱ्यांदा लग्न करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
आमिर खान आणि गौरी स्प्रॅटच्या लग्नाचा मुहूर्त ठरला?
मिळालेल्या माहितीनुसार, आमिर खान आणि त्याची मैत्रीण गौरी स्प्रॅट(Gauri Spratt) येत्या ५ जुलै रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. हा विवाहसोहळा अत्यंत साध्या आणि खाजगी (Private) पद्धतीने पार पडणार असल्याचं सांगितलं जात आहे. लग्नासाठी कोणताही भव्य सोहळा आयोजित करण्यात आलेला नसून केवळ कुटुंबीय आणि मोजक्या जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काही आवश्यक कायदेशीर कागदपत्रांवर स्वाक्षरी करून हे नातं अधिकृत करण्यात येणार आहे. गेल्या १ वर्षापासून आमिर आणि गौरी एकत्र राहत असून आता त्यांनी आपल्या नात्याला अधिकृत नाव देण्याचा निर्णय घेतल्याचं समजत आहे.
http://prahaar.in/2026/06/04/education-departments-decision-regarding-schools-in-the-state-schools-will-reopen-from-15th-june/
गौरी स्प्रॅट ही मूळची बेंगळुरूची रहिवासी आहे. तिचं शालेय शिक्षण ब्लू माउंटेन स्कूलमध्ये झालं असून तिने लंडनमधील ‘युनिव्हर्सिटी ऑफ द आर्ट्स’मधून फोटोग्राफी आणि स्टायलिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. आमिर आणि गौरी यांची ओळख तब्बल २५ वर्षांपासून असल्याचं सांगितलं जातं. मात्र, त्यांनी एकमेकांना डेट (Date) करण्यास सुमारे २ वर्षांपूर्वी सुरुवात केली. गौरीला ६ वर्षांचा मुलगाही आहे. सध्या ती आमिर खानच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये कार्यरत असून २०२५ मध्ये तिने याबाबत माहिती दिली होती.
आमिर खानचा पहिला विवाह
आमिर खानने १९८६ मध्ये रीना दत्ता यांच्यासोबत पहिलं लग्न केलं होतं. हे लग्न अत्यंत गुप्त पद्धतीने पार पडलं होतं. रीना आणि आमिर यांचा संसार तब्बल १६ वर्षे टिकला. अखेर २००२ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. या दाम्पत्याला आयरा आणि जुनैद ही दोन मुलं आहेत. घटस्फोटानंतरही दोघांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध कायम आहेत.
https://prahaar.in/2026/06/04/sea-will-experience-high-tides-24-times-during-this-monsoon-season/
किरण रावसोबत दुसरे लग्न
रीना दत्ता यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर आमिर खानने २००५ मध्ये चित्रपट निर्माती किरण राव यांच्यासोबत दुसरं लग्न केलं. या दोघांना आझाद राव खान नावाचा मुलगा आहे. जवळपास १५ वर्षे संसार केल्यानंतर २०२१ मध्ये त्यांनी परस्पर संमतीने वेगळं होण्याचा निर्णय जाहीर केला होता. आता किरण रावपासून विभक्त झाल्यानंतर जवळपास ५ वर्षांनी आमिर खान पुन्हा एकदा नव्या आयुष्याची सुरुवात करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, लग्नाबाबत अद्याप आमिर किंवा त्याच्या टीमकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.