मुंबई : शहरातील महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई मंडळाच्या २६४० घरांच्या सोडतीला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अर्ज प्रक्रियेसाठी दोन वेळा मुदतवाढ देण्यात आल्यानंतर मोठ्या संख्येने नागरिकांनी घरांसाठी अर्ज दाखल केले. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर समोर आलेल्या आकडेवारीनुसार, २६४० सदनिकांसाठी एकूण ९७,६१३ अर्ज प्राप्त झाले आहेत. (Mumbai Mhada Lottery)
म्हाडाने यावर्षी विविध उत्पन्न गटांसाठी मुंबईतील अनेक भागांमध्ये घरांची सोडत जाहीर केली होती. अर्ज करण्याची अंतिम मुदत २८ मे होती, तर अनामत रक्कम भरण्यासाठी २९ मेपर्यंतची मुदत देण्यात आली होती. या कालावधीत प्राप्त झालेल्या अर्जांपैकी ७५,३६६ अर्जदारांनी अनामत रक्कमही जमा केली आहे.
https://prahaar.in/2026/06/01/mumbai-police-video-commendable-act-by-mumbai-police-woman-attempting-suicide-rescued-video-goes-viral/
यंदाच्या सोडतीत विक्रोळी, गोरेगाव, बोरीवली, चेंबूर, वांद्रे, घाटकोपर, गिरगाव, वडाळा, पवई, दादर आणि माझगावसह विविध भागांतील घरांचा समावेश करण्यात आला आहे. अत्यल्प उत्पन्न गटासाठी १४५ घरे, अल्प उत्पन्न गटासाठी ८५८ घरे, मध्यम उत्पन्न गटासाठी ७९८ घरे आणि उच्च उत्पन्न गटासाठी ८३९ घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
म्हाडाकडून अर्जांची प्रारूप यादी १० जून रोजी दुपारी ३ वाजता अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर अर्जदारांना १२ जूनपर्यंत ऑनलाइन दावे आणि हरकती नोंदवण्याची संधी मिळणार आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १६ जून रोजी अंतिम यादी जाहीर केली जाईल.
दरम्यान, २०२४ च्या तुलनेत यंदाच्या सोडतीला अर्जदारांचा प्रतिसाद काहीसा कमी असल्याचे दिसून येत असले, तरीही हजारो नागरिकांनी स्वतःच्या घराच्या आशेने अर्ज दाखल केले आहेत. आता सर्वांचे लक्ष म्हाडाच्या संगणकीय सोडतीकडे लागले आहे.