उल्हासनगर : बदलापूरमध्ये उघडकीस आलेल्या बेकायदा स्त्री बीज दान प्रकरणाच्या तपासादरम्यान एका महिलेने तब्बल ३७ वेळा अंडाणू दान केल्याचे उघड झाले आहे. तीच महिला एजंट बनून आर्थिक अडचणीत असलेल्या महिलांना या रॅकेटमध्ये ओढत होती, असा आरोप पोलिसांनी केला आहे. सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान (एआरटी) कायद्यानुसार आयुष्यात केवळ एकदाच अंडाणू दान करण्यास परवानगी आहे. व्यावसायिक स्वरूपातील स्त्री बीज विक्रीवर बंदी असतानाही हे रॅकेट सुरू असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी अवघ्या ८८ दिवसांत जवळपास ५ हजार पानांचे आरोपपत्र उल्हासनगर न्यायालयात दाखल केले आहे. या रॅकेटमध्ये पाच डॉक्टर, महिला एजंट आणि अन्य संबंधितांसह एकूण १५ आरोपींचा समावेश करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या रॅकेटमध्ये थेट सहभागी असलेल्या आठ आरोपींना अटक करण्यात आली असून, अप्रत्यक्ष संबंध असलेल्या सात जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
https://prahaar.in/2026/05/21/gunfire-at-kailas-colony-square-in-ulhasnagar/
आरोपपत्रात २५ साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले असून सुमारे ३० महिलांमार्फत जवळपास २५० स्त्री बीज दान प्रकरणांची माहिती समोर आली आहे. महिलांना प्रत्येकी २५ ते ३० हजार रुपये देण्याचे आमिष दाखवून हार्मोनल इंजेक्शने दिली जात होती. योग्य वैद्यकीय देखरेखीशिवाय त्यांच्याकडून वारंवार स्त्री बीज काढले जात असल्याचा आरोप आहे. ही बीजे पुढे लाखो रुपयांना विकली जात असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. या प्रकरणात नाशिक येथील मालती आयव्हीएफ सेंटरचे संचालक डॉ. अमोल पाटील यांच्यासह काही डॉक्टर आणि महिला एजंटांना अटक करण्यात आली होती. मुंबई, ठाणे, पुणे आणि बारामतीतील विविध आयव्हीएफ केंद्रांमध्ये या महिलांचा वापर करण्यात आल्याचा संशय आहे.
https://prahaar.in/2026/05/21/success-in-saving-%e2%82%b9100-crore-in-cyber-crimes-in-mumbai/
मार्च महिन्यात उल्हासनगर महापालिकेच्या आरोग्य विभागाने भगवान हॉस्पिटलवर छापा टाकून बेकायदा सोनोग्राफी आणि वैद्यकीय नियमांचे उल्लंघन उघड केले होते. रुग्णांची योग्य नोंद नसणे आणि अपात्र व्यक्तींमार्फत प्रक्रिया केल्याचे आढळल्यानंतर संबंधित रुग्णालय सील करण्यात आले होते.