कोल्हापूर : कोल्हापुरातील एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण शहर हळहळून गेलं आहे. पत्नी आणि दोन मुलांना अपघातात गमावल्यानंतर नैराश्यात गेलेल्या विराट गौतम यांनी अखेर स्वतःचं आयुष्य संपवलं. ज्या पुईखडी घाटात त्यांच्या कुटुंबाचा अपघात झाला होता, त्याच ठिकाणी विष प्राशन करून त्यांनी आत्महत्या केली. या घटनेने कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
https://prahaar.in/2026/05/16/three-men-attack-rpf-jawan-at-kalyan-railway-station-atmosphere-of-fear-among-passengers/
काही माणसं आयुष्याचा अविभाज्य भाग असतात. त्यांच्याशिवाय जगण्याची कल्पनाही करता येत नाही. अशी माणसं अचानक कायमची दूर गेली की आयुष्याचा अर्थच हरवतो. प्रत्येक दिवस ओझं वाटू लागतो. एकाकीपणातून माणूस नैराश्याच्या गर्तेत जातो आणि अनेकदा टोकाचं पाऊल उचलतो. कोल्हापुरात घडलेली ही घटना त्याचं जिवंत उदाहरण ठरली आहे. पत्नी आणि दोन मुलांचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर विराट गौतम अडीच वर्षे मानसिक वेदनांमध्ये जगत होते. अखेर “तुमच्याशिवाय जगून काय करू?” अशी भावनिक पोस्ट सोशल मीडियावर लिहित त्यांनी जीवन संपवलं.
विराट गौतम हे मूळचे पुण्याचे रहिवासी होते. काल सकाळी पुईखडी घाटातून जाणाऱ्या काही प्रवाशांना दुर्गंधी येऊ लागल्याने त्यांनी परिसरात पाहणी केली. त्यावेळी घाटातील एका कोपऱ्यात सडलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला. नागरिकांनी तत्काळ करवीर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. मृतदेहाजवळ एक बॅग आणि मोबाईल सापडला. मोबाईल आणि इतर कागदपत्रांच्या आधारे मृताची ओळख विराट गौतम अशी पटली.
आत्महत्येपूर्वी विराट गौतम यांनी फेसबुकवर एक भावनिक पोस्ट लिहिली होती. “मी आज कोल्हापुरात देहत्याग केला आहे. माहीत नाही मी कसं जगतोय. काही लोक जगात असे असतात की त्यांच्याशिवाय जगणं कठीण होतं. असं वाटतं की हे लोक जगातून गेले तर आपण कसं जगणार? माझं जग तेव्हाच उजाडलं, जेव्हा माझ्या काळजाचे तुकडे गेले. निलू, रशिका आणि सर्विलच्याशिवाय मी अडीच वर्ष कसं जगलो हेच मला कळलं नाही,” असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं होतं. ही पोस्ट वाचल्यानंतर अनेकांच्या डोळ्यांत पाणी आलं.
https://prahaar.in/2026/05/16/son-kills-biological-parents-in-anger/
दरम्यान, तीन वर्षांपूर्वी घडलेल्या त्या भीषण अपघाताची आठवणही पुन्हा ताजी झाली आहे. २२ नोव्हेंबर २०२३ रोजी गोव्याहून पुण्याकडे जाणाऱ्या खासगी बसचा राधानगरी मार्गावरील पुईखडी घाटात भीषण अपघात झाला होता. चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने बस उलटली होती. या अपघातात विराट गौतम यांच्या पत्नी निलू गौतम (वय ४३), मुलगी रिद्धिमा गौतम (वय १७) आणि मुलगा सार्थक गौतम (वय १३) यांचा जागीच मृत्यू झाला होता. विराट गौतम मात्र या अपघातातून बचावले होते. आपल्या डोळ्यासमोर पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाल्याने त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्या धक्क्यातून ते कधीच बाहेर पडू शकले नाहीत.
अखेर ज्या ठिकाणी त्यांच्या संसाराचा अंत झाला, त्याच ठिकाणी विराट गौतम यांनीही जीवन संपवलं. या हृदयद्रावक घटनेने कोल्हापूरकर सुन्न झाले असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.