मुंबई : रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. मध्य रेल्वेकडून उद्यापासून सलग तीन दिवस रात्रकालीन विशेष ब्लॉक घेण्यात येणार असून, याचा फटका हजारो प्रवाशांना बसणार आहे. विद्याविहार स्थानकातील मध्यवर्ती पादचारी पुलाच्या (एफओबी) गर्डर बसवण्याच्या कामासाठी १५ मे ते १८ मेदरम्यान विशेष वाहतूक आणि वीजपुरवठा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे कुर्ला ते भांडुपदरम्यान अनेक लोकल सेवांमध्ये बदल करण्यात आले असून काही लोकल फेऱ्या रद्द देखील करण्यात येणार आहेत.
ब्लॉकच्या वेळापत्रकानुसार, शुक्रवारी मध्यरात्री १.१५ ते पहाटे ४.१५ वाजेपर्यंत, शनिवारी रात्री १२.१० ते पहाटे ४.४० वाजेपर्यंत आणि रविवारी मध्यरात्री १.१५ ते पहाटे ३.०५ वाजेपर्यंत विशेष ब्लॉक राहणार आहे. या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून रात्री ११.३० ते १२.१२ दरम्यान कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या धिम्या लोकल गाड्या माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत.
https://prahaar.in/2026/05/14/cng-price-hike/
तसेच कसाऱ्याहून रात्री १० वाजल्यापासून सीएसएमटीच्या दिशेने येणाऱ्या लोकल गाड्यांनाही मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान जलद मार्गावरून चालवण्यात येणार आहे. याशिवाय सीएसएमटीहून सुटणाऱ्या काही लोकल गाड्यांचा प्रवास कुर्ला येथेच संपवण्यात येणार असून, अप दिशेने येणाऱ्या काही गाड्या ठाणे येथेच थांबवण्यात येतील.
मध्य रेल्वेकडून हे गर्डर लाँचिंगचे काम तीन टप्प्यांत पार पडणार आहे. विद्याविहार स्थानकातील इंटरमीडिएट फूटओव्हर ब्रिजच्या कामासाठी शुक्रवारपासून सलग तीन रात्री विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या नोकरदार आणि प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.
https://prahaar.in/2026/05/14/shop-names-forget-english-are-actually-in-urdu-a-one-month-ultimatum-has-been-issued/
तीन दिवसांच्या या ब्लॉकमुळे मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत होण्याची शक्यता असून, आधीच उशिराने धावणाऱ्या गाड्यांमुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यात आता सलग तीन दिवस ब्लॉक घेतला जाणार असल्याने प्रवाशांचे हाल आणखी वाढणार आहेत. विशेषतः रात्री उशिरा कामावरून घरी परतणाऱ्या नोकरदारांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो.