२०२९च्या निवडणुकांसाठी भाजपची रणनीती; सर्व लहान-थोर कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणार
मुंबई : पश्चिम बंगालमधील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय जनता पक्षाने आता आपला मोर्चा महाराष्ट्राकडे वळवला आहे. बंगालमध्ये निवडणूक आयोगाच्या विशेष मतदार पुनरावलोकन (एसआयआर) मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीचा भाजपला मोठा फायदा झाल्याचे मानले जाते. आता हाच कित्ता महाराष्ट्रात गिरवत मराठी मुलूखावर घट्ट पकड निर्माण करण्याची रणनीती पक्षाने आखली आहे. या मोहिमेच्या तयारीसाठी बुधवारी दादर येथील वसंतस्मृती कार्यालयात एका विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
https://prahaar.in/2026/05/06/hindi-exam-for-government-officials-and-employees-postponed/
https://prahaar.in/2026/05/06/vinesh-phogat-wrestler-vinesh-phogat-gets-notice-from-ita-absence-in-doping-test/
भाजपने ‘एसआयआर’ मोहिमेच्या तयारीसाठी एक विस्तृत कार्यक्रम आखला आहे. सुरुवातीला स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर, टप्प्याटप्प्याने पंचायत समिती सदस्य, नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांना विभागीय पातळीवर प्रशिक्षित केले जाईल. त्यानंतर आमदार, खासदार आणि मंत्र्यांना प्रशिक्षण दिले जाणार असून, अंतिम टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करणार आहेत.
२०२९मध्ये स्वबळाची चर्चा
भाजपच्या या विशेष मोहिमेमुळे आगामी निवडणुका भाजप स्वबळावर लढणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात पुन्हा सुरू झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्या वर्षी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना, “भाजपला आता कुबड्यांची गरज नाही. आपण स्वबळावर चालणारा पक्ष आहोत,” असे सूचक विधान केले होते. या पार्श्वभूमीवर भाजपची ही नवी रणनीती अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.