Home साप्ताहिक अर्थविश्व IT Layoffs : आयटी क्षेत्राचा ‘ब्लॅक वेन्सडे’: तब्बल ३० हजार कर्मचाऱ्यांना एका झटक्यात कंपनीकडून मिळालं नारळ!

IT Layoffs : आयटी क्षेत्राचा ‘ब्लॅक वेन्सडे’: तब्बल ३० हजार कर्मचाऱ्यांना एका झटक्यात कंपनीकडून मिळालं नारळ!

0
IT Layoffs : आयटी क्षेत्राचा ‘ब्लॅक वेन्सडे’: तब्बल ३० हजार कर्मचाऱ्यांना एका झटक्यात कंपनीकडून मिळालं नारळ!

– सुमारे १२ हजार भारतीय कर्मचाऱ्यांची नोकरी गेली

मुंबई : सकाळची शिफ्ट सुरू होण्याआधीच आलेल्या एका ई-मेलने आयटी क्षेत्रात खळबळ उडवली. काहींची शिफ्ट सुरू झाली होती, तर काही कामावर जाण्याच्या तयारीत होते आणि तेवढ्यातच इनबॉक्समध्ये आलेल्या ई मेलने हजारो कर्मचाऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

सुरुवातीला अनेकांना हा एप्रिल फूलचा विनोद वाटला. पण काही मिनिटांत फोन, मेसेजेस सुरू झाले आणि वास्तव समोर आलं. हा खरोखरच layoff चा मेल होता. जागतिक आयटी कंपनी ओरॅकल कॉर्पोरेशन (Oracle Corporation) ने एकाच झटक्यात जगभरातील तब्बल ३० हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं. कंपनीच्या एकूण स्टाफपैकी सुमारे १८% कपात करण्यात आली आहे.

यातील सर्वाधिक फटका भारताला बसला असून, सुमारे १२ हजार भारतीय कर्मचाऱ्यांची नोकरी गेली आहे. त्यामुळे आयटी क्षेत्रासाठी आजची सकाळ ‘ब्लॅक वेन्सडे’ ठरली आहे.

पहाटे ५-६ वाजता आला धक्कादायक मेल :

कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पहाटे ५ ते ६ च्या दरम्यान कंपनीकडून मेल आला. त्या मेलमध्ये थेट सांगण्यात आलं की तुमची भूमिका आता redundant (अनावश्यक) झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, काही कर्मचाऱ्यांनी १५-२० वर्षे कंपनीत काम केलं होतं, तरीही कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आहे. मेल वाचताच अनेकांचे लॅपटॉप आणि सिस्टम ऍक्सेस देखील तात्काळ बंद करण्यात आले.

भारतामध्ये मोठी कपात :

भारतामध्ये ओरॅकल कॉर्पोरेशन या कंपनीचे जवळपास ३० हजार कर्मचारी होते, त्यापैकी ४०% म्हणजेच १२ हजार लोकांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. सोशल प्लॅटफॉर्म्सवर कर्मचाऱ्यांनी सांगितलं की; काही टीम्समध्ये ५०% पेक्षा जास्त कपात करण्यात आली, तर एका मॅनेजरच्या २० जणांच्या टीमपैकी ६ जणांना एकाच वेळी मेल आला.

याआधी Amazon सारख्या कंपन्यांनीही अशाच प्रकारचे कर्मचारी कपात केली होती. या सगळ्या प्रकारामुळे आयटी क्षेत्रात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

नवीन नोकऱ्या कमी मिळत असताना, आधीच कामावर असलेल्यांनाही अचानक बाहेर पडावं लागत असल्याने कर्मचारी चिंतेत आहेत. एकंदरीत, AI चा वाढता वापर आणि कंपन्यांचे बदलते धोरण यामुळे आयटी क्षेत्रात मोठे बदल होण्याची चिन्हं दिसत आहेत.