नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आशिया चषक स्पर्धेला २७ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेनिमित्त भारताचा कर्णधार रोहित शर्माला माजी कर्णधार विराट कोहलीचा विक्रम मोडण्याची संधी आहे. आपल्या नेतृत्वाखाली टी-२० सामने जिंकण्याच्या विक्रमामध्ये विराट कोहलीला मागे टाकण्याची संधी रोहितकडे आहे.
आशिया चषक स्पर्धा ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणार आहे. आशियातील ही सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा यूएईमध्ये खेळवली जाणार आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणाही केली आहे. या स्पर्धेकरिता रोहित शर्माकडेच नेतृत्वाची कमान सोपवण्यात आली आहे. त्यामुळे रोहितला माजी कर्णधार विराट कोहलीचा एक खास विक्रम मोडण्याची संधी आहे.
भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी-२० सामने जिंकले आहेत. या यादीत विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताने ३० सामने जिंकले आहेत. तर, आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून रोहितने आतापर्यंत २९ सामने जिंकले आहेत. यामुळे आशिया चषकात भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या रोहित शर्माकडे विराट कोहलीला मागे टाकण्याची संधी आहे.