Tuesday, May 21, 2024
Homeताज्या घडामोडीRamdas Athawale: रामदास आठवलेंना पुन्हा मिळणार राज्यसभेवर संधी

Ramdas Athawale: रामदास आठवलेंना पुन्हा मिळणार राज्यसभेवर संधी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन दिल्याची माहिती

मुंबई : शिर्डीतून लोकसभा लढवण्याची माझी इच्छा होती. त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले, पण यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अडचण झाली, असे केंद्रीय मंत्री आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी सांगितली.

राज्यसभेचा माझा कार्यकाळ २०२६ मध्ये संपेल. त्यानंतर मला पुन्हा संधी देण्यात येईल, असे फडणवीसांनी सांगितले आहे. सध्या रिपाइंकडे केंद्रात राज्यमंत्रीपद आहे. तुम्हाला कॅबिनेट मंत्रीपद मिळावे, यासाठी प्रयत्न करेन, असे आश्वासन फडणवीसांनी दिले आहे. राज्यात विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर एक मंत्रीपद, विधान परिषदेची आमदारकी दिली जाईल. दोन महामंडळांचे चेअरमनपद, सदस्यपद, जिल्हा तालुक्याच्या कमिट्या, एसईओमध्ये आरपीआयला प्राधान्य देण्यात येईल, असे आठवले म्हणाले.

‘सरकार आपल्या दारी’सारख्या कार्यक्रमांमध्ये तिन्ही पक्षांचे झेंडे असतात. पण रिपाईंचा झेंडा नसतो. याबद्दल आपण फडणवीसांकडे नाराजी बोलून दाखवल्याचेही त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडे एक जागा मागितली होती. शिर्डीतून लोकसभा लढवण्यास मी उत्सुक होतो. शिर्डीमधून मी २००९ मध्ये लढलो होतो. मला शिर्डीतून उमेदवारी मिळावी यासाठी फडणवीस यांनी प्रयत्न केले. पण या मतदारसंघात शिवसेनेचा खासदार असल्याने शिंदेंची अडचण झाली. लोकसभेला तुम्हालाच तिकीट देण्यात येईल, असे आश्वासन शिंदेंनी त्यांच्या सोबत आलेल्या खासदारांना आधीच दिले होते. त्यामुळे मला शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळू शकली नाही, असे आठवले म्हणाले.

रामदास आठवले यांना राज्यसभेवर पुन्हा पाठविण्याविषयी फडणवीसांनी आश्वासन दिल्याचे आठवले सांगत असले तरी आठवलेंच्या रिपाइंला लोकसभेकरिता एकही मतदारसंघ सोडण्यात आलेला नाही. दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांच्या वंचितने उमेदवार उभे कल्याने रिपाइं मतदार वंचितकडे वळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सत्तेवर असताना विकास न केल्याचा मविआला टोला

प्रकाश आंबेडकरांच्या वंचितने महाविकास आघाडीसोबत न जाता स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरही आठवलेंनी भाष्य केले. वंचितचा निर्णय योग्यच आहे. मविआमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिले. पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे त्यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. महाविकास आघाडीला सत्ता असताना विकास करता आला नाही, ते महाविकास काय करणार, असा टोलाही त्यांनी लगावला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -