लंडन: अनेकदा नशिबाची मर्जी नसेल तर कोणतेच काम पूर्ण होत नाही. असेच काहीसे टीम इंडियामध्ये पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असलेल्या पृथ्वी शॉबाबत (prithvi shaw) घडत आहे. पृथ्वी शॉ काऊंटी वनडे कपमध्ये (county one day cup) धमाकेदार कामगिरीनंतर दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर झाला आहे.
चार सामन्यानंतर झाला दुखापतग्रस्त
पृथ्वी शॉ गुडघ्याच्या दुखापतीमुळे संपूर्ण हंगामासाठी बाहेर झाला आहे. हंगामात त्याने चार सामने खेळले. नॉर्थमन्टनशरकडून खेळताना पहिल्या दोन सामन्यात त्याला केवळ ३४ आणि २६ धावा करता आल्या. यानंतर त्याने शानदार पुनरागमन करताना दुहेरी शतक ठोकले. २४४ धावांची खेळी त्याने समरसेटविरुद्ध खेळली. यानंतर पुढील सामन्यात डरहमविरुद्ध नाबाद १२५ धावा ठोकल्या. मात्र त्यानंतर तो दुखापतग्रस्त होत बाहेर गेला.
चार सामन्यात १४३च्या सरासरीने केल्या धावा
चार सामन्यात पृथ्वीने एकदा नाबाद राहत १४३च्या सरासरीने ४२९ धावा केल्या. यात दुहेरी शतकासह एकूण दोन शतकांचा समावेश आहे. पृथ्वी हाच शानदार फॉर्म कायम राखत एकदिवसीय विश्वचषकासाठी आपली दावेदारी सिद्ध करू शकला असता. मात्र त्याच्या हातून ही संधीही गेली.