मुंबई (प्रतिनिधी) : पावसाळ्यात मुंबईत डेंग्यू, मलेरिया यांसारखे साथीचे आजार पसरतात. दरम्यान यंदा पावसाळा सुरू झाला असला तरी या आजारांवरील औषधांची दरपत्रके अद्यापही पालिका प्रशासनाने तयार केली नसल्याचा आरोप भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे. लवकरात लवकर दरपत्रके काढावी यासाठी भाजपने पालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.
प्रभाकर शिंदे म्हणाले की, औषध अनुसूची क्र. १ (२०२१-२३) मध्ये इंजेक्शन अँड सेरा वॅक्सीनमध्ये पोटदुखी, भूल देण्याचे, टाके घालताना भूल देण्याचे, दम्याचे, अंगावरील सूज कमी करण्याचे, स्टेरॉईडचे अॅलर्जीमध्ये काम करणारे, तापाचे औषध, उलटी थांबण्याचे, ॲटीबायोटीक, कुत्रा चावल्यानंतर लागणारे इमुनीग्लोबिलीन रक्तदाब वाढवण्यासाठी लागणारे औषध, आकडी थांबविणारे औषध असे गुणधर्म असलेल्या अत्यंत महत्त्वाच्या बाबींचा एकूण ४७ बाबींमध्ये उल्लेख आहे. तसेच पावसाळ्यात थंडीतापाच्या पेशंटची संख्या झपाट्याने वाढते. यामध्ये डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड यासारखे आजार होतात.
या सर्व आजारांवरील तापाच्या औषधाची दरपत्रके अजून झालेली नसून ऑपरेशन करताना भूल देणारी औषधेसुध्दा यामध्ये आहेत. तसेच जंतूसंसर्ग होऊ नये म्हणून लागणारी सर्व प्रतिजैवके याचे दरपत्रक प्रसारीत करण्यात आलेले नाही. दम्यासाठी लागणारे महत्त्वाचे औषध याच बाबींमध्ये आहे. पावसाळ्यामध्ये जुलाब, उलट्या होऊन पोटदुखीचे गंभीर आजार होतात. त्यासाठी लागणारी सर्व औषधे यामध्ये आहेत, असे शिंदे म्हणाले.