Saturday, May 18, 2024
HomeदेशPew Research Center : ८० टक्के भारतीयांचा पंतप्रधान मोदींवर विश्वास

Pew Research Center : ८० टक्के भारतीयांचा पंतप्रधान मोदींवर विश्वास

परदेशातील ५५ टक्के भारतीयांची मोदींना पसंती : सर्वेक्षण

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची लोकप्रियता आणि प्रभावाबाबत प्यू रिसर्च सेंटरचा (Pew Research Center) अहवाल नुकताच जारी करण्यात आला आहे. यात १० पैकी आठ म्हणजेच ८० टक्के भारतीयांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन आहे आणि अलिकडच्या काळात मोदींच्या नेतृत्त्वात भारताचा जागतिक प्रभाव वाढल्याचा विश्वास १० पैकी सात भारतीयांना आहे. जी२० परिषदेपूर्वी मंगळवारी हा अहवाल जारी करण्यात आला आहे.

सर्वेक्षणात जगभरातील लोकांचे भारताविषयीचे मत सामान्यत: सकारात्मक होते. सरासरी ४६ टक्के लोकांनी भारताबाबत अनुकूल मत व्यक्त केले. तर ३४ टक्के लोकांचे मत प्रतिकूल होते. याशिवाय १६ टक्के लोकांनी कोणतेही मत व्यक्त केले नाही.

हे सर्वेक्षण जगातील २४ देशांमध्ये २० फेब्रुवारी पासून २२ मे दरम्यान करण्यात आल्याचे प्यू रिसर्च सेंटरने जारी केलेल्या अहवालात सांगितले आहे. सर्वेक्षणादरम्यान ३० हजार ८६१ लोकांशी संवाद साधण्यात आला. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलचे जागतिक मत आणि इतर देशांबद्दल भारतीयांचे मत तपासण्यात आले. प्यू रिसर्च सेंटरने भारतीयांच्या आवडीनिवडी आणि नापसंतीबाबत सर्वेक्षणाच्या अहवालात माहिती दिली आहे.

परदेशातील ५५ टक्के भारतीयांची मोदींना पसंती : सर्वेक्षण

प्यू रिसर्च सेंटरच्या अहवालात परदेशातील ५५ टक्के भारतीयांनी नरेंद्र मोदींवर पुन्हा विश्वास दाखवला आहे. मोदी २०१४ पासून सत्तेत आहेत आणि पुढच्या निवडणुकीत तिसरी टर्म देखील तेच पंतप्रधान असावेत असे त्यांचे मत आहे. २०२३ मध्ये केवळ २० टक्के भारतीयांनी मोदींबद्दल प्रतिकूल मत व्यक्त केल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.

याशिवाय दहा पैकी सात भारतीयांना वाटते की गेल्या काही वर्षात भारताचा प्रभाव अधिक मजबूत होत आहे. तर पाचपेक्षा कमी जणांना भारताचा प्रभाव कमकुवत झाल्याचे वाटते.

नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र धोरणामुळे परदेशात भारताचा दर्जा उंचावला आहे हे बहुतांश भारतीय मान्य करतात. आंतरराष्ट्रीय प्रकरणात योग्य पावलं उचलण्यावरुन पंतप्रधानांवर ३७ टक्के लोकांचा विश्वास आहे तर ४० टक्के लोकांनी पंतप्रधान मोदींवर विश्वास नसल्याचे सांगितले.

मोदींच्या नेतृत्त्वाखाली भारताचा प्रभाव वाढल्याचे ६८ टक्के लोकांचे मत

जगामध्ये भारताचा दबदबा वाढला आहे का, असा प्रश्न या सर्वेक्षणात विचारण्यात आला होता. याला उत्तर देताना ६८ टक्के लोकांनी पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली जगामध्ये भारताचा प्रभाव वाढल्याचे सांगितले. प्यू रिसर्च सेंटरच्या सर्वेक्षणात इस्रायलमधून आश्चर्यकारक निकाल समोर आला आहे. इस्रायलमध्ये राहणाऱ्या ७३ टक्के लोकांचा भारतावर विश्वास आहे.

रशिया हाच भारताचा खरा मित्र

दुसरीकडे भारतीयांचा अमेरिकेवरील विश्वास वाढला असला तरी रशियावरील विश्वास कमी झालेला नाही. ६५ टक्के भारतीयांचे मत आहे की अमेरिकेची भूमिका भारताच्या हिताची आहे तर ५७ टक्के लोक रशियाला भारताचा मित्र समजतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -