Friday, May 17, 2024
Homeताज्या घडामोडीDeepak Kesarkar : इतिहास एवढ्यासाठीच काढावा लागतो कारण इतिहास लोक पटकन विसरतात

Deepak Kesarkar : इतिहास एवढ्यासाठीच काढावा लागतो कारण इतिहास लोक पटकन विसरतात

बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले; दीपक केसरकरांची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

मुंबई : विरोधी पक्षांच्या आघाडीची (Opposition Parties) आज मुंबईत बैठक असून त्यासाठी जय्यत तयारी केली जात आहे. त्याआधी शिवसेनेचे नेते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी जम्मू-काश्मिरचे नेते फारुख अब्दुल्ला यांच्यावर टीका केली होती. आज त्यांच्यासोबतच उद्धव ठाकरे बैठक घेत आहेत. उद्धव ठाकरे यांना बाळासाहेबांच्या विचारांचा विसर पडला, अशी टीका केसरकर यांनी केली.

दीपक केसरकर म्हणाले, ज्या मुंबईत सर्व विरोधी पक्ष आज एकत्र येत आहेत ती बाळासाहेबांची मुंबई म्हणून ओळखली जाते. ज्या ठिकाणी सेल्युलर जेलमभून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाची पाटी काढली गेली, त्यावेळी मनीशंकर अय्यरांची बाळासाहेबांनी काय स्थिती केली होती, हे महाराष्ट्राची जनता विसरु शकत नाही. ते बाळासाहेबांचे जाज्वल्य विचार होते. बाळासाहेब म्हणाले होते की, एक वेळ मी माझा पक्ष विसर्जित करेन पण काँग्रेससोबत कधीही जाणार नाही, हे विचार उद्धव ठाकरे आज पायदळी तुडवत आहेत

जेव्हा २०१४ साली कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही तेव्हा शरद पवार साहेबांनी भाजपाला निर्विवाद पाठिंबा दिला होता. इतिहास एवढ्यासाठीच काढावा लागतो कारण इतिहास लोक पटकन विसरतात. आज आलेले विरोधी नेते बाळासाहेबांच्या समाधीवर जाऊन त्यांना वंदन करणार आहेत का? आज स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या झालेल्या अपमानाबद्दल जाब विचारला जाणार आहे का? असे सवाल दीपक केसरकर यांनी उपस्थित केले.

आज आदरणीय पंतप्रधान मोदीजींमुळे भारताची ताकद वाढली आहे. विरोधी म्हणतात की आमचा पक्ष बलवान झाला तर अरुणाचल मधून चीन मागे हटेल. मात्र तेवढी मोठी मिलिटरी पॉवर मोदीजींमुळे शक्य झाली. सीमेवर जाणारे रस्ते, रेल्वे तयार झाली आहे, पाकिस्तानची अवस्था नो व्हेअर झाली आहे, जगातले सगळे देश भारतात गुंतवणूक करु इच्छितात ही भारताची ख्याती मोदीजींमुळे झाली आहे. जीडीपीमध्ये भारताने नवव्या क्रमांकावरुन पाचव्या क्रमांकावर उडी घेतली आहे. अनेक करही कमी करण्यात आले, आणि आता गॅसच्या किंमती कमी केल्यानंतर तुम्हाला घाबरुन किंमती कमी केल्या हे विधान हास्यास्पद आहे, अशी दीपक केसरकर यांनी सडकून टीका केली.

गजानन किर्तीकर यांचीही टीका

शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनीदेखील विरोधी पक्षांच्या बैठकीवर जोरदार टीका केली. ममता बॅनर्जींनी ज्या तृणमूल पक्षाचं सरकार स्थापन केलं तो पक्ष इंडिया आघाडीत आहे. यात भरपूर विरोधाभास आहे. महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या दृष्टीने होणार्‍या या बैठकीच्या बाबतीत सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेला दुःखदायक असणारं चित्र पाहायला मिळणार आहे, ते म्हणजे उद्धव ठाकरे या सगळ्या हिंदुत्ववादाविरोधात येणार्‍या, समाजवादी पक्षाच्या नेत्यांना, राम मंदिराची रथ यात्रा होती ती अडवाणी साहेबांची आहे म्हणून त्यांना जेलमध्ये टाकणार्‍या, लालूप्रसाद अशा वृत्तीच्या लोकांचं या ठिकाणी स्वागत केलं जाणार आणि राहुल गांधींसारख्या दिशाहीन, नेतृत्वहीन, उद्दाम व्यक्तिमत्त्वाला पंतप्रधान बनवण्यासाठी उद्धव ठाकरे पायघड्या घालणार, अशी टीका त्यांनी केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -