चिपळूण (वार्ताहर) : मुंबई – गोवा महामार्गावरील चिपळूणनजीकचा परशुराम घाट येत्या बुधवारी २० एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. महामार्ग रुंदीकरच्या कामासाठी दुपारी १२ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद असणार आहे. हलक्या वाहनांची वाहतूक पर्यायी कळबस्ते मार्गाने वळविण्यात येणार आहे, तर जड वाहनांची वाहतूक दुपारी १२ ते संध्याकाळी ५ पर्यंत पूर्ण बंद राहणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुंबई – गोवा महामार्ग कोकणच्या नागमोडी वळणाचा असून डोंगरदऱ्यांतून तयार केलेला हा महामार्ग आहे. काही वर्षांपूर्वी याच महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली. त्यानंतर अनेक ठिकाणी अडचणी आल्या. पावसाळ्यात या ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्याने मोठा धोका निर्माण झाला होता. त्यातच आता काही ठिकाणी रस्ता खचू लागल्याने हा मार्ग धोकादायक बनला आहे. त्यामुळे परशुराम घाटाचे पावसाळ्यापूर्वी काम जलद गतीने पूर्ण होण्यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत.
पावसाळ्यात परशुराम घाटातील दरड कोसळून पाया लगतच्या पेढे गावातील तीन जणांचा मृत्यू झाला होता. तसेच येथील सहा घरांना फटका बसला होता. मात्र अजूनही धोका कायम आहे.