नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईचा धडाकेबाज फलंदाज सरफराज खानवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. त्याला लवकरच संधी मिळेल, परंतु, यावेळी संघात रचना आणि संतुलन आवश्यक आहे, असे टीम इंडियाच्या निवड समिती पॅनेलचे सदस्य श्रीधरन शरथ म्हणाले. सरफराज खानला भारतीय संघात स्थान न मिळाल्यामुळे सरफराज खानने नाराजी व्यक्त केली होती. गेल्या काही दिवसांपासून त्यावर चर्चाही रंगत आहेत. दरम्यान शुक्रवारी शरथ यांनी या विषयावरील मौन सोडले आहे. एका क्रीडा मासिकाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
शरथ यांनी विराट कोहली, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा यांसारख्या दिग्गजांसह युवा स्टार्सचे कौतुक केले. ते म्हणाले की कोहली अजूनही सामना विजेता आहे. त्याचवेळी चेतेश्वर पुजाराने फलंदाजीत स्थिरता आणली. रोहित शर्मा एक चांगला लीडर आणि उत्तम फलंदाज आहे. श्रेयस अय्यरने चांगली कामगिरी केली आहे. शुभमन गिल आणि के.एल. राहुलमध्ये सामने जिंकण्याची क्षमता आहे. आता या खेळाडूंच्या उपस्थितीमुळे संघात संतुलन आहे. जे खूप महत्त्वाचे आहे, असे शरथ म्हणाले.