मुंबई : संपूर्ण मुंबई मार्चपर्यंत खड्डेमुक्त करण्याचा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
मुंबईसह राज्यभरातल्या विविध भागांमधल्या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे जनता त्रस्त आहे. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबईकरांना नवी आशा दाखवली आहे. मार्चपर्यंत मुंबई खड्डेमुक्त होणार, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहे.
महाराष्ट्र स्वच्छ अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा आज शुभारंभ झाला. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मुंबई महापालिकेतील सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटचे झाले पाहिजेत असा आम्ही निर्णय घेतला आहे. मार्च पर्यंत सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटचे आणि खड्डे मुक्त दिसतील. मुंबईच्या ब्युटीफिकेशनचा मुद्दाही महत्वाचा असून त्याच्यावर काम सुरू आहे. पुढील ९० दिवसात मुंबईत अनेक बदल दिसतील. छोट्या छोट्या शहरांमध्ये युनिक प्रकल्प राबवणार आहोत. आज महाराष्ट्र स्वच्छ अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ झाला. स्वच्छता दूतांचे मी आभारी आहे कारण ते खरे या संकल्पनेचे ब्रॅन्ड अम्बॅसिडर आहेत. त्यांनी जर संप पुकारला तर काय होईल? महाविकास आघाडी सरकारला टोला लगावताना शिंदे म्हणाले की, पण तसे आता होणार नाही, कारण सरकार बदलले आहे. आम्ही चांगले मोठ-मोठे कार्यक्रम करतो. अडीच महिन्यांपूर्वी ते केलेले आहेत. सर्वच साफ करायचे आहे.
मुंबईतल्या खड्ड्यांबद्दल बोलताना शिंदे म्हणाले की, खडडे मुक्त रस्त्यांसाठी थोडेथोडे रस्ते न घेता ४५० किलोमीटरच्या रस्त्यांसाठी ५५० कोटी मंजूर केलेले आहेत. येत्या मार्चमध्ये मुंबईतील सर्व रस्ते खड्डे मुक्त होतील. हे सोपे काम होते पण ते आमच्या हातून होणार होते, ते बहुदा आमच्यासाठी राहिले होते.