Saturday, May 18, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यRelationship : विवाहित स्त्री-पुरुष पण एन्जॉय करू शकतात रिलेशनशिप...

Relationship : विवाहित स्त्री-पुरुष पण एन्जॉय करू शकतात रिलेशनशिप…

  • फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे

विवाहित पुरुष अथवा स्त्रीने इतर ठिकाणी शारीरिक, मानसिक, भावनिक संबंध (Relationship) प्रस्थापित करून रिलेशनशिप ठेवणे, ज्याला आपण व्याभिचार (अडेल्ट्री) म्हणतो हा कलम आता लागू होत नाही. कोणत्याही विवाहित स्त्री अथवा पुरुषाने विवाहबाह्य संबंध ठेवणे हा व्याभिचाराचा गुन्हा ठरत नाही.

समाजाच्या एकंदरीत बदलत्या परिस्थितीनुसार, कौटुंबिक आणि वैवाहिक संबंधांमध्ये वाढणाऱ्या ताणतणावानुसार आजच्या युगामध्ये, स्त्री आणि पुरुष समानता, त्यांचे वैयक्तिक, व्यक्तिगत स्वातंत्र्य, त्यांना असलेला जगण्याचा अधिकार, त्यांच्या शारीरिक, भावनिक, मानसिक गरजा आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या मार्गाने प्रयत्न करणे साफ चुकीचे आहे असे आपण म्हणू शकत नाही. चुकीच्या पद्धतीने कायद्याच्या वापरामुळे पुरुषांना खूप मानसिक यातना भोगाव्या लागल्या आहेत. बदलाच्या, सुडाच्या भावनेतून कोणत्याही कायद्याचा महिला गैरवापर करण्याचा देखील प्रयत्न करताना दिसतात.

आपली लग्न संस्था ज्या उद्देशाने बनली, जो काही हेतू त्यामागे होता तो हेतूच जर आज समाजात अनेक पती-पत्नी एकत्र राहताना सफल होताना दिसत नसेल तर त्या विवाह संस्थेला किंवा विवाहाला अर्थच राहत नाही. केवळ लग्न झालं आहे म्हणून, जो जोडीदार पदरात पडला आहे त्यासोबत नांदणे बंधनकारक आहे म्हणून, विवाहविषयक विविध कायद्याची भीती आणि त्यातून होणाऱ्या बदनामीची भीती म्हणून बरेच नवरा-बायको एकत्र आहेत. अनेकदा आपल्या समाजात झालेली लग्न ही दबावाखाली, कर्मठपणा, जातीयवाद, हुंडा, आर्थिक परिस्थिती, प्रॉपर्टी, देणे-घेणे, समोरील पार्टीकडून आपल्याला होणारे काही फायदे अथवा लाभ, घराणेशाही, खानदानी परंपरा, रितीरिवाज या गोष्टी समोर ठेवून ठरवली जातात.

अनेकदा लग्न ही सामाजिक भीड बाळगल्यामुळे, जबरदस्तीने झालेली असतात. लग्नाआधी होणाऱ्या पती-पत्नीची मतं त्यांचे जोडीदाराबाबतचे विचार, आवड-निवड आजही विचारात घेतली जात नाही. लग्नाचे वय झाले आहे. चांगले स्थळ सांगून आले आहे. हातातून जायला नको, मुलगा किंवा मुलगी नात्यातले आहेत, कमावते आहेत, बाहेर काही प्रकरण करेल, कोणासोबत पळून जाईल. त्याआधी लग्न लावून मोकळे झालेले बरे, वेळेत मुलबाळ होणं गरजेचे आहे, जबाबदारी पार पाडायची आहे, तर कधी काही मजबुरी आहे, मागे भावंड आहेत, बहिणी आहेत, आई-वडील नाहीत, नातेवाईक निर्णय घेणारे आहेत, परिस्थिती गरिबीची आहे किंवा तोला-मोलाचे स्थळ आहे, घरात काम करायला, हातभार लावायला कोणी नाही या आणि अशा विचारधारेवर आपली लग्न संस्था टिकून आहे. याही पलीकडे जाऊन अगदी परस्पर संमतीने देखील लग्न झालेली असतील, लव्ह मॅरेज जरी झालेले असेल तरी तो विवाह शेवटपर्यंत व्यवस्थित टिकेल, दोघेही आयुष्यभर एकमेकांना साथ देतील आणि एकमेकांशी प्रामाणिक असतील अशी खूप कमी उदाहरणं आहेत. संसार उत्तम रितीने सुरूच राहील, विवाहाचा हेतू साध्य होईलच याला शाश्वती नसते. कोणताही विवाह हा १००% यशस्वी आणि आदर्श नसतो हे आजमितीला निदर्शनास येते आहे.

काही ठिकाणी पती अथवा पत्नीला कोणताही शारीरिक अथवा मानसिक आजार असतो, कधी दिसायला दोघेही एकमेकांना अनुरूप नसतात, दोघांच्या वयात खूप अंतर असते, शैक्षणिक ताफावत असते, तर काही ठिकाणी त्यांचे वैचारिक मतभेद असतात आवडी-निवडी, सवयी जुळत नसतात, करिअर बाबतीत भिन्न विचार असतात, तर काही ठिकाणी शारीरिक संबंध बाबतीत कोणीतरी एकजण खूप उदासीन असतो. काही वेळेस पैसा, व्यावसायिक ताण- तणाव, नोकरी, करिअरच्या समस्या यामुळे पती-पत्नी लांब राहत असतात. काही वेळेस ठरावीक वयानंतर आपली निवड चुकली याची जाणीव होते. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते, कधी मुलं होत नाहीत म्हणून पती-पत्नी नैराश्यात गेलेले असतात. अनेकदा दोघांतील एक जण शारीरिक संबंध बंदच करून टाकतो. काही ठिकाणी एकमेकांवर संशय, अपमानास्पद वागणूक, अपशब्द, मारहाण, कौटुंबिक हिंसाचार यामुळे जोडीदार मनातून उतरलेला असतो.

अनेक पती-पत्नी जरी एकत्र ऐका घरात राहताना दिसले तरीही त्यात बहुतांश वेळी तडजोड, मुलांसाठी, कुटुंबासाठी केलेला स्वतःच्या भावनांचा, आवडीचा, मनाचा, अपेक्षांचा त्याग, मनमारून जगणं, सतत कुढत राहून समाज काय म्हणेल ही भीती दडलेली असते. अनेक पती-पत्नी असे आहेत जे स्वतः सुशिक्षित आहेत, कमावते आहेत, एकत्र नांदत आहेत, सर्व जबाबदाऱ्या आणि कर्तव्यसुद्धा पार पाडत आहेत, समाजात वावरताना स्वतःला एक आदर्श कुटुंब दाखवत आहेत, त्यांची मुलबाळं उच्च शिक्षण घेत आहेत, कुटुंब सेटल आहे, आर्थिक, व्यावसायिक स्थिरता आहे, भरलं घर आहे, करिअर आहे, स्थावर मालमत्ता, गाडी, बंगला, उच्च जीवनशैली आहे तरीही एकमेकांच्या बाबतीत शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्तरावर असमाधानी, नाखूष आहेत.

पती अथवा पत्नी दोघांच्या एकमेकांना सुखी ठेवण्याच्या कल्पना, भावनिक आधार देण्याच्या अपेक्षा, शारीरिक सुख आणि समाधान देण्या-घेण्याच्या पद्धती कुठेही कमी पडत असतील, तर त्यांची खूप घुसमट होत असते. या गोष्टी घरात, नातेवाइकांत कोणाला सांगणेची सोय नसते तिथे बदनामीची भीती असते. यासारख्या गोष्टीवरून वाद घालणे, भांडणे, मतभेद जगजाहीर होणे यामुळे कुटुंब आणि मुलं पण डिस्टर्ब होण्याची शक्यता असते. त्यामुळे पूर्ण आयुष्य अशा जोडीदारासोबत घालवणे जिथे आपल्याला हवं ते हवं तसं हवं तेव्हा मिळत नाहीये हे खूप मोठे आव्हान आजमितीला लग्न व्यवस्थेसमोर आहे.

या आणि अशा परिस्थितीमधून मधला मार्ग काढण्यासाठी घटस्फोट न घेता, एकत्र राहून पण अनेक विवाहित स्त्री-पुरुष दुसऱ्या कोणाच्या प्रेमात पडणे, त्यांची भावनिक जवळीक निर्माण होणे, त्यांच्यातील शारीरिक सुखाच्या आणि समाधानाच्या संकल्पना जुळणे यातून एकत्र येताना दिसतात. प्रेमाची आधाराची, चांगल्या जोडीदाराची, आपल्याला समजावून आणि सामावून घेणाऱ्याची प्रत्येक स्त्री-पुरुषाला गरज असते आणि ते नैसर्गिक आहे, स्वाभाविक आहे त्यात वावगं काहीही नाही. आपापले संसार, कुटुंब टिकवून सुद्धा, एकमेकांना कोणताही त्रास न देता, कोणत्याही अनावश्यक अनाठायी अपेक्षा न ठेवता फक्त प्रेम, बांधिलकी, आकर्षण, आधार, मानसिक स्थिरता, शारीरिक सुख यासाठी अशा खूप रिलेशनशिप सुरू असून त्या यशस्वीरीत्या निभावल्या पण जात आहेत.

एकमेकांच्या संसारात ढवळाढवळ न करता, एकमेकांच्या कुटुंबात, घरात हस्तक्षेप न करता एकमेकांच्या लग्नाच्या जोडीदाराला कोणताही त्रास होणार नाही, कुटुंबाला कोणताही त्रास होणार नाही हे सांभाळून रिलेशनशिप ठेवावी या मूलभूत तत्त्वावर अशा रिलेशनशिप आनंदाने स्वीकारून त्या आजमितीला एन्जॉय करण्यात अनेक जण अग्रेसर आहेत.

अशा रिलेशनशिपचा आनंद घेता आल्यामुळे अनेकजण नैराश्यात जाण्यापूर्वी, आत्मविश्वास गमावण्याची वेळ येण्यापूर्वी चांगले आयुष्य जगत आहेत. प्रापंचिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्यापेक्षा, शारीरिक, मानसिक दृष्टीने कमकुवत होत जाण्यापेक्षा, एकटे पडण्यापेक्षा, मनोरुग्ण होण्यापेक्षा रिलेशनशिपमार्फत आयुष्यातला गमावलेला आनंद परत मिळवत आहेत. पती आणि पत्नी एकमेकांसाठी कोणत्याही कारणास्तव विरोधाभासात असतील, कुठेही एकमेकांसाठी कमी पडत असतील, तर ती उणीव भरून काढण्यासाठी दुसरा पर्याय शोधणं यात गैर काहीच नाही. पती अथवा पत्नी जे काही विवाहबाह्य संबंध ठेवत असतील आणि त्यांच्या वैयक्तिक गरजा त्यातून भागत असतील, तर त्याला कायद्याने व्याभिचार म्हणून गुन्ह्याचे स्वरूप देऊन शिक्षा देणे हा माणूस म्हणून त्यावर केलेला अन्याय आहे आणि या ऐका कृतीमुळे त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करणं देखील चुकीचं आहे. याबाबतीत जर पती-पत्नी ना परस्परांप्रति आक्षेप असेल, तर कायद्याने त्यांना घटस्फोट घेऊन वेगळे होण्याची सुविधा उपलब्ध आहे.

meenonline@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -