‘जरांगेंच्या आंदोलनाचा काय फायदा झाला?’ नेटकर्यांचा सवाल
जालना: मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेला मुद्दा अजूनही पूर्णपणे निकालात आलेला नाही. जालना (Jalna) येथील आंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर (Maratha protesters) झालेल्या लाठीचार्जमुळे हे आंदोलन राज्यव्यापी झाले. त्यानंतर मराठा आरक्षणासाठी उपोषण करणार्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना राज्यभरातून लाखो मराठ्यांनी पाठिंबा दिला. मात्र, अंतिम तारीख उलटून गेल्यावरही मराठा आरक्षण मिळण्यात अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळेच मनोज जरांगे यांनी १० फेब्रुवारीपासून पुन्हा बेमुदत उपोषण सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
मनोज जरांगे हे काहीच दिवसांपूर्वी लाखो मराठ्यांचा ताफा घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. मात्र, २७ जानेवारी रोजी ते वाशीपर्यंत पोहोचताच त्यांच्या सर्व मागण्या मान्य करणारा जीआर सरकारने काढला. तसेच, इतर कोणत्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. त्यामुळे लवकरच मराठा आरक्षण मिळणार अशी खात्री मराठ्यांना मिळाली. याबद्दल राज्यभरात जल्लोषही साजरा करण्यात आला. मात्र, दुसरीकडे सोशल मीडियावरून मरोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनामुळे काय फायदा झाला? असा प्रश्न काही युजर्सकडून विचारण्यात येत आहे. त्यावर जरांगेंनी आंतरवाली सराटीमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना उत्तर दिलं.
सोशल मीडियावर बोलणाऱ्या काही लोकांनी सत्ताधारी व विरोधी पक्षांमधील काही नेत्यांकडून माझ्याविरोधात बोलण्याची सुपारी घेतली आहे, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केला. “महाराष्ट्रातील काही १०-२० जणं सरकारी व विरोधी पक्षांची सुपारी घेऊन सलग बोलत राहतात. आंदोलनातून काय मिळालं, काय नाही मिळालं असं ते सोशल मीडियावर विचारत असतात. पण हा लढा त्यांच्यासाठी नाही आहे. हा लढा मराठा समाजासाठी आहे. सत्ताधारी व विरोधी पक्षातले लोक जाणून-बुजून बोलतायत. जर ते इथून पुढे गप्प बसले नाहीत, तर मी त्यांच्या पक्षाच्या नेत्यासह नावं जाहीर करेन”, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
मराठा समाजाचेही काही जळणारे नेते
“मला बाजूला करण्यासाठी यांचे प्रयत्न चालू आहेत. माझे करोडो मराठा बांधव मला सांगत नाहीत तोपर्यंत मी बाजूला हटत नाही. श्रेयासाठी हे विनाकारण मध्ये घुसायला लागले आहेत. मराठा समाजाचेही काही जळणारे नेते आहेत”, असंही मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले.
जरांगे मॅनेजही होत नाही, फुटतही नाही…
“हे ठरलेले १५-२० जण आहेत. मराठ्यांच्या जिवावर खाणारे आहेत ते. गरीब घरातला मुलगा मराठ्यांसाठी लढतोय ही यांची सगळ्यात मोठी पोटदुखी आहे. हा मॅनेजही होत नाही, फुटतही नाही आपलं काय होणार? असा प्रश्न त्यांना पडलाय. मी १० तारखेला या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी बेमुदत उपोषण करणार आहे. जोपर्यंत कायद्याची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत उपोषण करणार. मी कुठेही बसलो, तरी मराठा आरक्षणावरच बोलतो. मला चार भिंतीत दुसरं काही करायचं असतं, तर मी मागच्या दारातून घरी गेलो असतो. लोकांमध्ये कशाला आलो असतो?” असा सवालही जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे.