नाशिक (प्रतिनिधी) : आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याच्या बाजारपेठेसाठी प्रसिद्ध असलेली लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आजपासून दहा दिवस बंद राहणार आहे. लासलगावसह जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या दिवाळीनिमित्त बंद राहणार असल्यामुळे आधीच परतीच्या पावसामुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांची यामुळे कोंडी झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. त्यामुळे कांदा पिकासह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर अशातच दिवाळीचा सण सुरू झाल्याने लासलगावला सलग दहा दिवस कांद्याचे लिलाव बंद राहणार आहेत. लासलगाव कांदा बाजार समितीतून देशभरात कांद्याची निर्यात केली जाते. मात्र आता बाजार समिती दहा दिवस बंद राहणार असल्याने देशभरात परिणाम जाणवण्याची चिन्हे आहेत. परिणामी कांद्याचे किरकोळ बाजारातील दर आणि घसरण्याची शक्यता आहे.
नाशिकच्या लासलगाव बाजारपेठेतूनच देशभरात कांद्याचा पुरवठा केला जातो. यंदा अतिवृष्टीमुळे कांदा उत्पादक अडचणीत आहेत. त्यातच परतीच्या पावसाने ही धुमाकूळ घातल्याने कांदा चाळीत ठेवलेला उन्हाळी कांदाही खराब झाला आहे. त्यामुळे दिवाळीनंतर कांद्याच्या अवस्थेवर परिणाम होऊ शकतो. त्यातच आता दिवाळीनिमित्त लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सलग दहा दिवस बंद राहणार आहे.