सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : कोकणातील समुद्रात विषारी जेलीफिशचे संकट (Jellyfish Crisis) दिसून येत असल्यामुळे येथील मच्छीमारांची चिंता वाढली आहे. हे जेलीफीश समुद्रातील मासेमारीसाठी घातक ठरत आहेत.
कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड समुद्र किनाऱ्यावर जेलीफिश आढळून येत असल्यामुळे मच्छीमार त्रस्त झाले आहेत. समुद्रात मासेमारीला घातक जेलीफिशची वाढ झाल्याने मासळी मिळणेही मुश्कील झाले आहे. त्यामुळे माशांच्या उत्पादन देखील घट झाली आहे.
कोकणात पारंपरिक मच्छीव्यवसायाबरोबरच खोल समुद्रात जाऊन मच्छी व्यवसाय करणाऱ्या मच्छीमार व्यावसायिकांसमोर हे अनोखे संकट काही नवे नाही; परंतु आता उद्भवणाऱ्या परिस्थितीवर उपाय काय याचा विचार मच्छीमार व्यावसायिक करताना दिसून येत आहे.
मासेमारीसाठी मच्छीमार खोल समुद्रात जातात. मात्र, त्यांच्या जाळ्यात जेलीफिश मोठ्या प्रमाणात अडकत आहेत. परिणामी उत्पादनावर विपरीत परिणाम होत असल्याने मत्स्य व्यावसायिक चिंताग्रस्त झाले आहेत.
पर्यटन आणि मासेमारीवर अवलंबून असणाऱ्यांना मासेमारी व्यवसाय जेलीफिशमुळे मोठ्या संकटात सापडला आहे. मासेमारीसाठी टाकलेली जाळीत विषारी जेलीफिशने भरून निघते. ही जेलीफिश जाळीतून बाजूला करण्याचा प्रयत्न केला तर हाताला खाज सुटते. विषारी जेलीफिश आणि मत्स्य उत्पादनात होणारी तूट यामुळे मच्छीमार संकटात सापडला आहे.
जेलीफिश सारखी नैसर्गिक आपत्तीमुळे कोकणातील मच्छीमार मेटाकुटीला आल्याची परिस्थिती आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, वेंगुर्लेमधील वायंगणी समुद्र किनाऱ्यावरील मच्छीमार मासेमारीसाठी खोल समुद्रात गेले असता मोठ्या प्रमाणात जेलीफिश जाळयात अडकत असल्याने हैराण झाले आहेत. आधीच हवामान बदलाचा परिणाम मासेमारी होत असल्याने माशांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे आधीच अडचणीत असलेला मच्छीमार या जेलीफिशमुळे आणखी अडचणीत येऊ लागला आहे.