जरांगे २० जानेवारीपासून आझाद मैदानात उपोषण करणार
बीड : बीडमध्ये आज मराठ्यांच्या एकजुटीचा महाप्रलय जमला असून मराठा आरक्षण (Maratha Reservation) आता कसे आणायचे ते बघाच, मराठा आरक्षण मिळवणारच, असा इशारा मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी दिला. मराठा समाजाच्या पुढच्या पीढीला आरक्षण मिळवून देणार. या आधीच्या पीढीचे आयुष्य आरक्षणाविना उद्ध्वस्त झालं. आता मराठा जागा झाला आहे. पुढील उपोषण आता २० जानेवारीपासून आझाद मैदानात करणार असल्याची घोषणा जरांगे यांनी यावेळी केली. मराठा समाज आतापर्यंत शांत आहे, पण सरकारने झोपू नये, असा धमकी वजा इशारा देताना त्यांनी मुंबईला जाताना कोणतीही जाळपोळ, हिंसाचार करु नये असे समाजाला आवाहन केले.
ते येवल्याचं येडपट माझी शाळा काढतंय, याला मंत्री कुणी केला? असा सवाल करत जरांगे यांनी राज्याचे मंत्री छगन भुजबळांवर (Chhagan Bhujbal) कडाडून हल्ला केला.
मनोज जरांगे म्हणाले की, सरकारने पुन्हा एकदा डाव रचला आहे. मराठा समाजातील आंदोलकांना नोटिस दिल्या. ट्रॅक्टर घेऊन सभेला गेला तर तो जप्त केला जाईल, असं त्यात म्हटलंय. महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी आंदोलन करायचं पण शांततेत, ते ब्रह्मात्र आहे. शांततेत आंदोलन केल्यास ते थांबवायचं कुणाच्यात हिंमत नाही, असा संदेश जरांगेंनी यावेळी दिला.
मनोज जरांगे म्हणाले की, “मराठा समाजाला डाग लावण्यात आला आहे, कुणी म्हणतंय आमची घरं जाळली, तर कुणी म्हटलं हॉटेल जाळली. आपल्यावर खोटे आरोप करण्य़ात आले. मराठा समाजाने आतापर्यंत शांततेत मोर्चे काढले, तो समाज कुणाची घरं कशाला पेटवेल? यांच्याच लोकांनी हॉटेलं जाळली आणि नाव मराठा समाजावर घातलं. सरकारही यांचंच ऐकतंय. पण आता मराठा समाज जागा झाला आहे. त्यामुळे मराठा आरक्षण कसं आणायचं ते बघाच.”
जरांगे पुढे म्हणाले की, “सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी. त्या एकट्याचं ऐकून जर तुम्ही आमच्या विरोधात भूमिका घेणार असाल, आरक्षणामध्ये आडकाठी करणार असाल तर शहाणे व्हा. मराठा समाजाला ताटकळत ठेऊ नका. नाहीतर शांततेत तुमचा सुफडा साफ केला जाईल. तुमचं राजकीय अस्तित्व संपवलं जाईल. तुम्ही ठरल्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण द्या, नाहीतर पुढचं आंदोलन तुम्हाला १०० टक्के जड जाणार. मी यांना मॅनेज होत नाही हाच यांचा प्रॉब्लेम आहे. मी जिवंत असेपर्यंत मराठा आरक्षण मिळवून देणारच. मराठा समाज आणि माझं नातं हे माय-लेकाचं आहे.”