जी-२० मध्ये भारत-अरब राष्ट्र-युरोपीय संघाच्या नव्या कॉरीडॉरची घोषणा
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनचा वाढता आक्रमकपणा आणि अर्थनीतीमुळे भारतासह युरोप आणि अरब राष्ट्रांबरोबर अमेरिकेलाही झुंजावे लागत आहे. यापार्श्वभूमीवर सध्या नवी दिल्ली येथे सुरु असलेल्या जी-२० या राष्ट्रप्रमुखांच्या परिषदेत चीनच्या वाढत्या दादागिरीला रोखण्यासाठी भारतीय उपखंड ते युरोपीयन महासंघ व्हाया अरब राष्ट्र असा नवा रस्ते आणि दळणवळणाच्या अनुषंगाने कॉरिडॉर उभारण्याच्या दृष्टीने तयारी दाखवली आहे.
चीनने श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये अगदी आतपर्यंत रस्ते बांधून स्वतःचे एक जाळे निर्माण केले आहे. मात्र भारताने पाकिस्तान मार्गे इराणपर्यंत अशा पध्दतीचा वायु गॅस पाईपलाईन प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न केला. परंतु कालांतराने पाकिस्तानने या प्रकल्पाला विरोध केल्याने हा प्रकल्प बारगळला. अखेर भारताने युरोप मार्गे अरबस्थानातील इराण आणि इतर देशाला जोडणारा पर्याय शोधला आहे.
भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी भारताला समुद्री मार्गे आणि रेल्वे मार्गे युरोप आणि अरब राष्ट्रांना जोडण्याच्या उद्देशाने अमेरिकेचे अधिकारी जेक सुवेलिएन मे महिन्यात भेटले होते. त्यानंतर या प्रकल्पाच्या अनुषंगाने अनेक गोष्टींची भर पडली.
जी-२०च्या निमित्ताने या युरोपियन महासंघ, अरब अमिराती, सौदी अरेबिया आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष उपस्थित असल्याचे औचित्य साधत या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. तसेच या संबंधित मार्गाचा आराखडा प्राथमिक स्तरावर कसा असेल यावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
या प्रकल्पांतर्गत अरेबियन पेनुन्सुला येथे पोहचण्याच्या ठिकाणापर्यंत जो रेल्वे मार्ग असेल त्याच्या शेजारी इमारती उभारण्याचा प्रस्ताव असून तो अरब अमिरात आणि सौदी अरेबिया पर्यंत विकसित करण्याचे जवळपास निश्चित करण्यात आले आहे. तसेच या सगळ्या भागाला समुद्री मार्गे विकसित करत युरोपला जोडण्यात येणार असल्याच्या मुद्यावर चर्चा करण्यात आली.
त्याचबरोबर ऊर्जा निर्माण करणारी साधने जी असतील ती पाईपलाईनद्वारे आणि ऑप्टीकल फायबरद्वारे दळणवळण करण्यात येणार आहेत. या प्रकल्पात इस्त्रायलच्या तेल अविव, रियाध आदी प्रदेशांना जोडण्याचा विचार आहे. या प्रकल्पामुळे भविष्यकाळात भौगोलिक राजकारण मोठ्या प्रमाणावर बदलले जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
काही वर्षापूर्वी भारत आणि अमेरिकेदरम्यान ऊर्जाचे आदान-प्रदान करण्यासाठी अशाच पध्दतीच्या एका प्रकल्पावर काम सुरु असल्याची चर्चा आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरु होती. मात्र आता भारत युरोपपर्यंत पोहचण्यासाठी अरब पेन्युनसुला मार्गे युरोप पर्यंत मार्ग आखला आहे. विशेष म्हणजे अमेरिका भारता दरम्यानच्या प्रकल्पसारखाच हा प्रकल्प असून त्यावर लवकरच अमलबजावणी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.