Sunday, May 19, 2024
Homeसाप्ताहिककोलाजHindi Old song : तू इस तरहसे मेरी जिंदगीमे शामिल हैं...

Hindi Old song : तू इस तरहसे मेरी जिंदगीमे शामिल हैं…

  • नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे

दिग्दर्शक अंबरीश संगल यांच्या १९८०ला रिलीज झालेल्या ‘आप तो ऐसे ना थे’चे निर्माते होते मोहनकुमार! सिनेमा म्हणजे पुन्हा एक प्रेमाचा त्रिकोण आणि त्याला मैत्रीतील त्यागाची किनार अशी कथा होती. कलाकारात राज बब्बर, रंजिता, दीपक पाराशर यांच्याबरोबर होते ओम शिवपुरी, मदन पुरी आणि पाहुणे म्हणून येऊन गेलेले भगवानदादा!

अतिश्रीमंत वर्षाचे (रंजिता) प्रेम आहे विजयवर (राज बब्बर). विजय एक साधारण फर्निचर विक्रेता आहे. तिचे काका (ओम शिवपुरी) तिचा प्रेमाने सांभाळ करत असले तरी वास्तवात ते एक तस्कर असतात. अर्थात हे उशिरा स्पष्ट होते. त्यांच्या व्यावसायिक स्वार्थासाठी ते वर्षाच्या संपर्कात आलेल्या कोट्यधीश विक्रमबरोबर (दीपक पाराशर) तिला लग्न करण्याचा आग्रह करतात. विक्रम हा विजयचा जवळचा मित्रच असतो. दोघांची मैत्री अतूट असते.

विक्रम एका मोठ्या जहाज कंपनीचा मालक असल्याने त्याच्या जहाजातून आपला तस्करीचा धंदा बिनबोभाट चालेल, अशी वर्षाच्या काकांची योजना असते. वर्षा जेव्हा विजयशीच लग्नाचा हट्ट धरते, तेव्हा ते तिला विजयच्या घरच्यांना संपवण्याची धमकी देऊन विक्रमशीच प्रेमाचे नाटक आणि लग्न करण्यासाठी तयार करतात.

शेवटी अनेक फिल्मी घडामोडी होऊन विक्रमला विजय आणि वर्षाच्या प्रेमाबद्दल समजते आणि तोच दोघांना जवळ आणतो अशी बरीच गुंतागुंतीची, फिल्मी आणि सुमार कथा. मात्र निदा फाजली यांनी लिहिलेले आणि उषा खन्ना यांनी मधुर संगीत दिलेले सिनेमाचे शीर्षकगीत फारच सुंदर होते.

सिनेमाच्या सुरुवातीला आई-वडील नसलेली वर्षा (रंजिता) लंडनहून फिरून आल्यावर प्रियकर विजयला (राज बब्बर) भेटते. तेव्हा यौवनसुलभ उत्सुकतेने विचारते –
“मी इतके दिवस दूर होते तर तुला माझी आठवण आली का?” तो उत्तर देतो. “नाही!”
काहीशी रागावलेली रंजिता विचारते,
“काय, माझी आठवणसुद्धा आली नाही?”
“अजिबात नाही.” तो खोडकरपणे उत्तर देतो. ती नाराज होते.
लगेच तो उत्तरतो –
“अगं वेडे, आठवण त्याची येते ज्याला आपण विसरलेलो असतो. तू तर माझ्या जीवनात इतकी मिसळून गेली आहेस की, मी जिथे जातो तिथे जणू तुझाच दरबार भरलेला असतो. मी तुला कसा विसरणार आणि मग तुझी वेगळी आठवण तरी कशी काढणार?”

संवादाच्या अशा काहीशा काव्यमय पार्श्वभूमीवर शायर निदा फाझली यांचे गीत सुरू होते –
तू इस तरहसे मेरी ज़िन्दगीमें शामिल हैं,
जहाँ भी जाऊँ ये लगता हैं तेरी महफ़िल हैं…
या गाण्याची गंमत अशी की, सिनेमात ते तीन वेगवेगळ्या वेळी तीन गायकांनी गायले होते. मात्र ते द्वंद्वगीत नव्हते. तिन्ही वेळा ते एकाचेच गाणे आहे. हेमलता, मनहर उदास आणि रफीसाहेबांनी निदा फाजली यांचे भावुक शब्द, उषा खन्नांच्या बहारदार संगीत दिग्दर्शनात अजरामर केले आहेत. जोवर रोमँटिक प्रेम आहे, तारुण्यसुलभ उत्कटता आहे तोवर हे गाणे सिनेरसिकात लोकप्रियच राहणार.
प्रेमात पडल्यावर प्रेमिकाची जगाबद्दल काही तक्रारच राहत नाही. त्याला सगळे जग छान आहे, बदलले आहे, सगळे ठीकच चालले आहे, असे वाटू लागते. तो प्रेमात इतका बुडालेला असतो की माझी प्रिया हेच माझ्या जीवनाचे शेवटचे टोक आहे आणि सगळे जीवन तिच्या दिशेने होणारा माझा प्रवास आहे, अशी त्याची भावना असते.

ये आसमान, ये बादल, ये रास्ते, ये हवा.
हर एक चीज़ हैं अपनी जगह ठिकानेसे,
कई दिनोंसे शिकायत नहीं ज़मानेसे,
ये ज़िन्दगी हैं सफ़र, तू सफ़रकी मंज़िल हैं.
जहाँ भी जाऊँ…

जोवर तू नव्हतीस तोवर माझ्या जीवनात जणू एक पोकळी होती. मी होकायंत्र हरवल्यामुळे भरकटलेल्या एखाद्या जहाजांसारखा निरुद्देश भटकत होतो. पण तुझ्या मिठीत येऊन मनाला केवढी शांती मिळाली. आता वाटते मी अथांग समुद्रात उठलेली एक दिशाहीन लाट होती आणि तू माझा किनारा झालीस.

तेरे बगैर जहांमें, कोई कमीसी थी,
भटक रही थी जवानी अँधेरी राहोंमें,
सुकून दिलको मिला आके तेरी बाहोंमें.
मैं एक खोयी हुई मौज हूँ तू साहिल हैं,
जहाँ भी जाऊँ…
प्रेमाची नशाच काही और असते. प्रियकर म्हणतो, प्रिये, तुझ्या सौंदर्यामुळेच तर माझे जग झगमगते आहे. तुझ्यातील अनोखेपण शोधण्याचा माझा नेहमीचाच शोध असाच आयुष्यभर सुरू राहावा आणि तुझ्या रूपातील आकर्षण पण असेच कायम राहावे. मला लागलेले तुझे वेड असेच ताजेतवाने राहावे इतकीच देवाकडे प्रार्थना आहे. कारण तुझे प्रेमच तर माझ्या सर्व आनंदाचे फलित आहे.

तेरे जमालसे रोशन हैं कायनात मेरी,
मेरी तलाश तेरी दिलकशी रहे बाकी,
खुदा करे के ये दिवानगी रहे बाकी,
तेरी वफ़ाही मेरी हर ख़ुशी का हासिल हैं.
जहाँ भी जाऊँ…
प्रिया सोबत नसेल तेव्हाही त्याचे मन तिच्याच आठवणींनी घेरलेले राहते. तिची एकेक आठवण सुवासिक फुलासारखी मनात दरवळत राहते. तिच्या विचाराने सर्व वातावरण कसे मोहरून उठते.

ही वरवर जाणारी हिरवीगार झाडे त्याला जणू काही प्रेमाच्या उर्ध्वगामी प्रार्थनाच वाटतात. ती जवळ नसली तरी तीच त्याच्या डोळ्यांसमोर दिसत राहते.
हर एक फूल किसी यादसा महकता हैं,
तेरे ख़यालसे जागी हुई फिजायें हैं,
ये सब्ज़ पेड़ हैं, या प्यारकी दुआएं हैं,
तू पास हो के नहीं फिर भी तू मुक़ाबिल हैं,
जहाँ भी जाऊँ…
तिच्या आठवणीत किंवा तिच्या उपस्थितीत, प्रियकराला सगळे काही सुंदर, चमचमते वाटत असते. तो म्हणतो प्रेमाच्या प्रकाशाने माझे जगच उजळून निघते आहे. जर जीवनात प्रेम नसेल, तर ते अधुरे आहे. प्रवास एकट्याने करायचा म्हटले तर तो अवघड वाटू लागतो ना? जर कुणी प्रेमाचे माणूस बरोबर नसेल, तर प्रवासाला काय अर्थ? पण मला मात्र मी जाईन तिथे तुझाच भास होत राहतो इतकी तू माझ्या जीवनात मिसळून गेली आहेस –
हर एक शय हैं मोहब्बतके नूरसे रोशन,
ये रोशनी जो ना हो, ज़िन्दगी अधुरी हैं,
राह-ए-वफ़ामें, कोई हमसफ़र ज़रूरी हैं,
ये रास्ता कहीं तन्हाँ कटे तो मुश्कील हैं,
जहाँ भी जाऊँ…
जुने एकेक गाणे म्हणजे तारुण्यातील प्रेमाच्या शारीरिक ओढीपलीकडे जाऊन दिलेला उदात्त भावनिक अनुभव असायचा. आजच्या अगदी ढोबळ, बेबंद, स्वच्छंदी जगण्याच्या पार्श्वभूमीवर तर त्याचे महत्त्व अधिकच जास्त जाणवते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -