मुंबई : (प्रतिनिधी) : ‘पोल्ट्री‘साठी प्रदूषण नियंत्रण मंडळासह सरकारची परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे. पाच हजारांहून अधिक पक्षी असलेले व्यावसायिक या अधिकार कक्षेत आणले गेले आहेत. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्यासंबंधीचे आदेश जारी केले आहेत.
केंद्रीय प्रदूषण नियत्रंण मंडळातर्फे ‘पोल्ट्री‘ व्यवसायाबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला मार्गदर्शन तत्त्वे दिली आहेत. हरित लवादात गौरी माऊलीखी यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करत पाच हजारांपेक्षा अधिक पक्षी असलेल्या प्रकल्पाला प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी घेण्याचे बंधनकारक करण्याचे आदेश हरित लवादाने दिले आहेत.
तसेच कुक्कुटपालन प्रकल्प उभारताना लोकवस्तीपासून पाचशे मीटर लांब असावा. नदी-नाल्यापासून दूर असावा. राष्ट्रीय महामार्गापासून व मुख्य रस्त्यापासून शंभर मीटर दूर असावा, आदी अटी घातल्या आहेत. त्यांची अंमलबजावणी १ जानेवारी २०२३ पासून केली जाईल.