संजय राऊतांच्या ‘त्या’ विधानाने समोर आले सत्य
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) देत असलेल्या वागणुकीमुळे नाराज असल्याचे चित्र आहे. वंचित आघाडी समोर ठेवत असलेला जागांचा प्रस्ताव मविआला मात्र मान्य नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावरील विश्वास उडाला असल्याचे सांगत वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसची (Congress) वाट धरली होती. यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या एका वक्तव्यामुळे हे नाराजीनाट्य पुन्हा एकदा समोर आले आहे. तसेच मविआ-वंचित आघाडी यांची युती जवळजवळ फिस्कटल्याचे निश्चित झाले आहे.
संजय राऊत म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे सन्माननीय नेते आहेत. त्यांच्याशी अनेकदा चर्चा झाली. आम्ही त्यांना ४ जागांवर लढावे हा प्रस्ताव दिला. परंतु त्यांची वेगळी भूमिका आम्हाला दिसतेय. तो प्रस्ताव मान्य केला असता तर नक्की आम्हाला आनंद झाला असता असं म्हणत संजय राऊत यांनी वंचित बहुजन आघाडीसोबतच्या युतीवर भाष्य केले आहे.
संजय राऊतांच्या या विधानामुळे दोन्ही पक्ष एकमेकांसोबत जागावाटपाबाबत सामंजस्याची भूमिका घेत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे यानंतर प्रकाश आंबेडकर काय निर्णय घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.