Friday, May 17, 2024
Homeमहत्वाची बातमीफाइल मिळाली पण, बंगले आणि पुरावे गायब!

फाइल मिळाली पण, बंगले आणि पुरावे गायब!

उद्धव ठाकरेंच्या १९ बंगल्यांच्या घोटाळ्याची चौकशी करण्याची सोमय्यांची मागणी

मुंबई : रायगड जिल्ह्यातील कोर्लई गावातील उद्धव ठाकरे यांच्या १९ बंगल्यांची मंत्रालयातून गायब झालेली फाईल सापडली असली तरी या फाईलमधील ठाकरे यांनी गायब केलेले बंगले अजूनही मिळालेले नाहीत. तसेच त्यावेळी रश्मी ठाकरे यांनी जो प्रॉपर्टी टॅक्स भरला होता आणि अन्वय नाईक यांच्याकडून बंगले घेतल्या संदर्भातील मी पुरावे पत्रकार परिषदेत दिले होते. ते आणि या फाईल मधील अनेक कागदपत्रे आणि मी दिलेले पुरावे हे गायब केले गेले आहेत, असा खळबळजनक दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

तेव्हा, ठाकरेंनी केलेल्या या बंगल्यांच्या घोटाळ्याची उच्चस्तरीय किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले.

अलिबाग जवळच्या कोर्लई गावात उद्धव ठाकरे यांची पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावाने १९ बंगले अधिकृतपणे बांधण्यात आले होते. पण, आरोप करण्यात आल्यानंतर हे १९ बंगले जमीनदोस्त झाले, असा आरोप किरीट सोमय्या यांनी यापूर्वी केला आहे. किरीट सोमय्या यांनी याबाबत तक्रार सुद्धा दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आतापर्यंत ७ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी रेवदंडा पोलिसांनी कोर्लई गावातील माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना अटक केली होती.

‘अशी ही बनवाबनवी’

सोमय्या म्हणाले की, या १९ बंगल्यांच्या घोटाळ्याची उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या मार्फत चौकशी करावी किंवा अन्य तपास यंत्रणांची मदत घ्यावी, अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांना केली आहे. २१ एप्रिलला मुख्यमंत्री कार्यालय आणि महसूल कार्यालयाने फाईल एकमेकांकडे असल्याचे सांगितले होते. काल महसूल मंत्रालयाकडून मला फोन आला की महसूल मंत्रालयातील एका अधिकाऱ्याच्या कपाटात ही फाईल होती. खरेच ती फाईल महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कपाटात होती का, असा सवाल करत ‘अशी ही बनवाबनवी’ असे या फाइलला नाव देणार असल्याचे सोमय्या म्हणाले.

पुरावे केले गायब, अधिकारी सुद्धा दोषी, कारवाईची मागणी

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना फक्त जागेवर जाऊन फोटो काढण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी रश्मी ठाकरे यांनी जो प्रॉपर्टी टॅक्स भरला होता आणि अन्वय नाईक यांच्याकडून बंगले घेतल्या संदर्भातील मी पुरावे पत्रकार परिषदेत दिले होते. या फाईल मधील अनेक कागदपत्रे आणि मी दिलेले पुरावे हे गायब केले गेले आहेत, असे ते म्हणाले.

खोटी प्रॉपर्टी उभी केल्यासंदर्भात रश्मी ठाकरे विरोधात खरंतर उद्धव ठाकरे यांनी गुन्हा दाखल केला पाहिजे होता. ज्या अधिकाऱ्यांनी या रिपोर्टवर सह्या केल्या आहेत ते अधिकारी सुद्धा दोषी आहेत, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -