घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो धावतायत १५ ते २० मिनिटे उशिरा
मुंबई : उन्हाळ्यात अंगाची काहिली होत असताना अनेकजण एसी लोकल किंवा मेट्रोचा पर्याय निवडतात. मात्र, गर्दीच्या वेळी झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे ऐन उन्हाळ्यात घाटकोपर ते वर्सोवा मेट्रोसेवा काही काळ रखडली होती. आता ही सेवा पूर्ववत झाली असली तरी सर्व मेट्रो १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. त्यामुळे मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी झाली आहे.
घाटकोपर-वर्सोवा ट्रेन सेवेमध्ये सकाळी तांत्रिक बिघाड झाला होता. यावेळी काही काळासाठी मेट्रो सेवा पूर्णपणे रखडली होती. त्यामुळे मुंबईकरांचे ऐन गर्दीच्या वेळी हाल झाले. मेट्रो प्रशासनाने तांत्रिक बिघाड झाल्याचं कारण सांगितलं. यानंतर काही वेळाने रखडलेली मेट्रो सेवा पुन्हा सुरु झाली.
काही प्रवासी मेट्रोमध्ये अडकून होते
सकाळी ऑफिस आणि कॉलेज किंवा इतर कामानिमित्त लोकल आणि मेट्रो प्रवाशांची संख्या मोठी असते. त्यात अचानक तांत्रिक बिघाडामुळे मेट्रो रखडली आणि यामुळे अनेक प्रवाशांची वाताहत झाली. सकाळी मेट्रो काही काळासाठी रखडली होती, त्यामुळे प्रवासी बराच वेळ मेट्रोमध्ये अडकून होते. अनेक प्रवाशांना कार्यालयात पोहोचायला उशिर झाला.