मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ७१ हजार लोकांना नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले. यानिमित्ताने केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत नवनियुक्त उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वितरण करण्यात आले.
रोजगार मेळाव्याद्वारे आतापर्यंत केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये २ लाखांहून अधिक तरुणांची भरती करण्यात आली आहे. एकट्या मध्य रेल्वेने याआधी १९११ तरुणांना मागील रोजगार मेळाव्यात नियुक्त केले आहे. तर आज मध्य रेल्वेच्या मुंबई, नागपूर, पुणे आदी विभागांमध्ये नवनियुक्त उमेदवारांना २५३२ नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले.
रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेची पूर्तता करण्याच्या दिशेने हा रोजगार मेळा एक पुढचे पाऊल आहे. रोजगार मेळावा पुढील रोजगार निर्मितीसाठी उत्प्रेरक म्हणून काम करेल आणि तरुणांना त्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि राष्ट्रीय विकासात सहभागासाठी अर्थपूर्ण संधी प्रदान करेल अशी अपेक्षा आहे.
यावेळी ट्रेन मॅनेजर, स्टेशन मास्टर, सीनियर कमर्शियल क्लर्क कम तिकीट क्लर्क, इन्स्पेक्टर, सब इन्स्पेक्टर, कॉन्स्टेबल, स्टेनोग्राफर, ज्युनियर अकाउंटंट, पोस्टल असिस्टंट, इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर, टॅक्स असिस्टंट, सीनियर ड्राफ्ट्समन, जेई/पर्यवेक्षक, सहाय्यक प्रोफेसर, शिक्षक, यांसारखी पदे तसेच ग्रंथपाल, परिचारिका, परिविक्षा अधिकारी, पीए, एमटीएस आणि इतरांना यामध्ये नियुक्ती पत्रांचे वितरण करण्यात आले.
यानुसार, विविध सरकारी विभागांमध्ये नव्याने नियुक्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी असलेला ऑनलाइन अभिमुखता अभ्यासक्रम ‘कर्मयोगी प्रमुख’ द्वारे नव्याने भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना स्वतःला प्रशिक्षित करण्याची संधी मिळणार आहे.