Saturday, June 1, 2024
Homeताज्या घडामोडीमिठी नदी परिसरातील कुटुंबांचे पुनर्वसन करण्याची मागणी

मिठी नदी परिसरातील कुटुंबांचे पुनर्वसन करण्याची मागणी

मुंबई (प्रतिनिधी) : २६ जुलै २००५ मध्ये आलेल्या महापुरात मिठी नदी परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले आणि कुटुंब उद्ध्वस्त झाली. त्यानंतर येथील नागरिकांचे पुनर्वसन करण्यात येईल, अशी ग्वाही राज्य सरकार व मुंबई महापालिका प्रशासनाने दिली होती. मात्र अद्याप पुनर्वसन न झाल्याने दरवर्षी पावसाळ्यात मिठी नदी परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण होते. त्यामुळे मिठी नदी परिसरातील कुटुंबांचे पुनर्वसन करण्याची मागणी येथील नागरिक करत आहेत.

क्रांतीनगर आणि संदेशनगरमधील २४० कुटुंबांचे पुनर्वसन कुर्ला प्रिमिअर येथे करण्यात आले आहे. एसआरएची घरे येथील स्थलांतरीतांसाठी असल्याचे समजते. मात्र स्थानिक आमदार आणि शासकीय यंत्रणा यांच्या दिरंगाईमुळे नागरिकांचे स्थलांतर रखडले असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. पावसाळा आला की रात्र जागून काढतो. त्यामुळे लवकरात लवकर पुनर्वसन करावे अशी मागणी येथील स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

मिठी नदीच्या जवळपास क्रांती नगर आणि संदेशनगर या दोन झोपडपट्ट्या मागील अनेक वर्षांपासून वसलेल्या आहेत. येथील १६५० झोपड्यांना नदीचा धोका आहे. २६ जुलै २००५ मध्ये झालेल्या महाप्रलयात येथील झोपडपट्ट्या पूराच्या पाण्याखाली गेल्या होत्या. दरवर्षीच्या पावसात मिठीला पूर आल्यानंतर पहिला फटका या दोन झोपडपट्ट्यांना बसतो. वन आणि महसूल विभाग व मुंबई महानगर पालिका या यंत्रणा दरवर्षी पावसाळ्यात मिठी लगतच्या झोपडपट्ट्यांना धोक्याचा इशारा देतात. मिठी नदीच्या पातळीत वाढ झाली, की या झोपडीधारकांना पालिका शाळांत तात्पुरता निवारा देण्यात येतो. त्यामुळे ही तात्पुरती व्यवस्था असल्याने दरवर्षी पावसाळ्यात मिठी नदी परिसरातील नागरिकांचा जीव टांगणीला लागलेला असतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -