सहा आरोपी जेरबंद
अलिबाग : पेण पोलीस ठाणे हद्दीतील २२ मे रोजी सायंकाळी चार वाजता अंबविली फाटा नवीन साई सहारा हॉटेलपासून काही अंतरावर खड्डयात एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला होता. याची नोंद पेण पोलिसात होताच तीन दिवसात या खुनाचा छडा स्थानिक गुन्हे अन्वेषण रायगडने लावत सहा आरोपींना जेरबंद केले. याबाबत पेण पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खुनाच्या या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, सपोनि भास्कर जाधव, सपोनि संदीप पोमण, पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे, पोलीस उपनिरीक्षक विकास चव्हाण व अंमलदार यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर या घटनेचा समांतर तपास सुरू झाला. प्रथम मृताची ओळख पटविणे, आरोपीचा शोध घेणे हे महत्वाचे आव्हान पोलिसांसमोर होते. तपास पथके तीन दिवस तपास करीत असताना आरोपी अनुज भालचंद्र मोरे (रा. आजाद नगर मांटुगा वेस्ट मुंबई) निष्पन्न झाला. या आरोपीकडे सखोल चौकशी करता, त्याने हा गुन्हा कबुल करीत या गुन्हयातील आपल्या सहकारी साथीदारांची नावे सांगितली. त्यानुसार दुसऱ्या पथकाने आरोपी मनोज विष्णू गांगुर्डे, गणेश नारायण देशमुख, कानिफनाथ सुरेश म्हात्रे, सुमीत केशव चैरे यांना पनवेल परिसरातून तात्काळ ताब्यात घेतले.
या गुन्हयात एक महिला आरोपी असल्याचेही निष्पन्न झाल्याने पथकाने महिला अंमलदारासह जाऊन रसायनी परिसरातून आरोपी महिलेला ताब्यात घेतले. त्यामुळे एकूण सहा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्याकडे चौकशी करता, त्यांनी हा गुन्हा कबूल केला.
नेमकं घडलं काय?
या चौकशीत मृताचे नाव अभिषेक पूर्ण नाव व पत्ता माहित नाही. हा पनवेलच्या हॉटेल पंजाबी पॅलेट याठिकाणी कामाला होता. गुन्हयातील महिला आरोपी ही देखील तेथेच सफाईचे काम करीत होती. अभिषेक हा महिला आरोपीस त्रास देत होता, तसेच तिचे मोबाईलमध्ये व्हिडीओ बनवत होता. त्यानंतर अभिषेक काम सोडून तेथून निघून गेला. १७ मे रोजी केलेल्या कामाचा पगार घेण्यासाठी अभिषेक हॉटेलवर आला असताना त्याने महिला आरोपीचा मोबाईल चोरून घेऊन गेला होता.
दरम्यान, या गुन्हयातील आरोपीही या हॉटेलमध्ये काम करणारे मॅनेजर, वेटर व स्वयंपाकी आहेत. त्यामुळे अभिषेकने तिच्यासोबत केलेला प्रकार महिला आरोपीने मॅनेजर आरोपी मनोज गांगुर्डे यांना सांगताच अभिषेकला १९ मे रोजी बोलावून घेतले. त्यानंतर महिलेस त्रास देणे, तिचा मोबाईल चोरी करणे याबाबत अभिषेककडे विचारणा करीत त्याला सर्व आरोपींनी लाथाबुक्यांनी मारल्याने त्याच्या जागीच मृत्यू झाला. त्यानंतर अभिषेकचा मृतदेह हॉटेलच्या फ्रीजमध्ये कोंबून बसविले आणि नंतर एका भाडयाचा टेम्पो बोलावून मृतदेहाला ग्रीनपार्क धाब्यावर आणून ठेवला. रात्र झाल्यानंतर अभिषेकचा मृतदेह गोणीत भरून रस्त्याच्या कडेला फेकून देत सर्व आरोपी पसार झाले होते.