मुंबई : वरळीच्या जांबोरी मैदानात याआधी सचिन अहिर हे दरवर्षी दहीहंडी आयोजित करत असत. मात्र आगामी मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कोरोना काळानंतर यावर्षी पहिल्यांदाच होणारी वरळीतील दहीहंडी भाजपने ‘हायजॅक’ केली आहे.
आशिष शेलार यांनी मुंबई भाजप अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली आणि थेट शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघाकडे लक्ष वळवले आहे. माजी पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मुंबईतील वरळी या मतदारसंघात भाजपने भव्य दहीहंडी सोहळ्याचे आयोजन केले आहे. वरळीच्या जांबोरी मैदानात भाजपची दहीहंडी होणार आहे. विशेष म्हणजे वरळीत शिवसेनेचे तीन आमदार आणि अनेक नगरसेवक असताना आणि यापूर्वी दहीहंडी उत्सव आयोजनाचा दांडगा अनुभव सचिन अहिरांच्या पाठीशी असतानाही आता शिवसेनेला दहीहंडीसाठी दुसरे मैदान शोधावे लागत आहे. त्यामुळे दहीहंडीवरुन वरळीत राजकीय काला पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
वरळीच्या जांबोरी मैदानात आशिष शेलार यांचे निकटवर्तीय संतोष पांडे यांनी दहीहंडी सोहळ्याचे आयोजन केले आहे. आदित्य यांच्या मतदारसंघात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करुन आशिष शेलार यांचा मतदारांना भाजपच्या बाजूने वळवण्याचा इरादा स्पष्ट दिसत आहे.