क्राइम : अॅड. रिया करंजकर
साठ वर्षांपूर्वीची मुंबई आणि आताची मुंबई यात जमीन आस्मानाचा फरक झालेला आहे. साठ वर्षांपूर्वी लोक नोकरीनिमित्त गावाकडून मुंबईला यायचे. त्यावेळी ते एकटेच व त्यांचे कुटुंब गावाकडे असे त्यामुळे ही लोकं खानावळीमध्ये जेवत असत आणि आपल्या नातेवाइकांच्या घरी पाच-सहा जण एकत्र राहत असत. अशाप्रकारे त्यावेळी मुंबईत येणारी लोकं आपल्या राहण्याचा आणि खाण्याचा प्रश्न सोडवत होते. त्यानंतर पागडी पद्धतीने घर निर्माण झाले. यामध्ये घरमालक असायचे आणि ते आपले रूम विकत असत पण जोपर्यंत तो भाडोत्री राहणार आहे तोपर्यंत तो घरमालकाला त्या रूमची भाडं देत असे. राहायला येणाऱ्या भाडोत्रींनी ते रूम विकत घेऊन घरमालकाला दर महिन्याला भाडही द्यावं लागत असे. ज्यावेळी त्या भाडोत्रीला रूम विकायचे असेल त्यावेळी त्याची अर्धी रक्कम मालकाला द्यावी लागत असे. अजूनही असे पगडी पद्धतीमध्ये चालू आहे. या पगडी पद्धतीची घरं चाळ पद्धतीची आहेत. आता ती खूप जुनी होऊन ८० च्या पार या इमारती गेलेल्या आहेत. या इमारती मधल्या खोल्या लहान होत्या. पण भाडेकरू आपल्या कुटुंबाला, मित्रपरिवाला घेऊन या खोल्यांमध्ये राहायचे. पण आता विभक्त कुटुंब पद्धती आल्यानंतर याच खोल्या माणसांना लहान वाटू लागल्या. काही भाडोत्री त्या खोल्या सोडून उपनगरामध्ये राहायला गेले.
शामराव हे मुंबईमध्ये पागडी पद्धतीच्या घरामध्ये राहत होते. त्यांच्या वडिलांनी ही खोली मालकाकडून विकत घेतलेली होती आणि दर महिन्याला मालक भाडही आकारत होता. चाळीमध्ये रूम असल्यामुळे बाथरूम हा सार्वजनिक होता. शामराव आणि रामराव हे त्या खोलीमध्ये राहत होते. त्या दोघांची लग्न झाल्यावर ती खोली त्यांना कमी पडू लागली म्हणून रामराव हा उपनगरात आपल्या कुटुंबासह राहायला गेला. शामराव मात्र तिथेच राहू लागला. शामरावच्या मुलांची शिक्षण तिथे झाली. मुलं मोठी झाल्यावर रामराव आणि शामराव यांच्यामध्ये त्या खोलीवरून वाद होऊ लागले. रामराव शामरावला म्हणाले की, वडिलांनी घेतलेल्या खोलीत एवढी वर्ष राहिलास. मी उपनगरात राहत होतो. मला तो प्रवास लांब पडत होता तरी मी तो केला. आता आपण ही खोली विकायला काढूया. वडिलांची खोली आहे म्हणून शामराव ती विकण्यास तयार नव्हते. त्याच्यामुळे त्या दोघांमध्ये वाद वाढले आणि रामराव याने शामरावला ती खोली खाली करण्यास सांगितली. एवढी वर्षे तू राहिलास आता मी राहायला येतो असं ते शामरावला म्हणाले. शामरावनेही भावाच्या शब्दाचा मान ठेवून आपल्या मुलांसह ते उपनगरात राहायला गेले. रामरावाने भावाला मी राहायला येतो असं सांगितलं पण ते त्या ठिकाणी राहायला आले नाहीत कारण त्यांना आणि त्यांच्या मुलांना मोठ्या घराची सवय झालेली होती. ती लहान घरात अॅडजेस्ट करू शकत नव्हते आणि महत्त्वाचं म्हणजे सार्वजनिक बाथरूम ते वापरू शकत नव्हते. म्हणून ते घर तसंच बंद होतं. त्यामुळे त्या खोलीत भाडोत्री ठेवले होते. त्यामुळे एक महिन्याचा भाडं शामराव तर एक महिन्याचा भाडं रामराव घेत होते.
एक वर्ष होऊन गेल्यानंतर त्या खोलीत राहणाऱ्या शामरावांना असं कळालं की त्या बिल्डिंगचा जो मालक आहे त्यांनी शामराव आणि रामराव यांच्याविरुद्ध सिविल कोर्टमध्ये केस फाईल केलेली आहे. कारण ही खोली पागडी पद्धतीची होती. ही खोली ज्यांनी विकत घेतली तोच या खोलीत राहू शकतो. तिसऱ्या व्यक्तीला भाड्याने देऊ शकत नाही हा कायदा असल्यामुळे त्या कायद्याच्या अंतर्गत बिल्डिंग मालकाने या दोघांच्या विरुद्ध कोर्टामध्ये केस फाईल केली. घर मालकाला त्या दोघांचे पत्ते माहीत नसल्यामुळे बिल्डिंगमध्ये जो त्यांचा पत्ता होता त्या पत्त्यावर कोर्टातून नोटीस येत होते आणि दोन वेळा ते मागेही गेल्या होत्या. यामुळे दोघांना कोर्टाची नोटीस मिळाली नव्हती. ती खोली घरमालकाच्या ताब्यात जाणार होती तरीही त्या दोघांनाही कोर्टाची नोटीस सर्विस झाली नव्हती.
त्या दोघांना समजलं होतं की कोर्टात केस फाईल केली आहे पण नोटीसच सर्विस होत नसल्यामुळे ते कोर्टात आपली बाजू मांडू शकत नव्हते. म्हणून वकिलांच्या सल्ल्याने त्यांना एक-दीड महिना तरी तुमच्या दोघांपैकी कोणीतरी त्या रूमवर राहा, नोटीस स्वीकारा आणि मग पुढची आपल्याला प्रक्रिया करता येईल असा योग्य सल्ला देण्यात आला. कारण हे जे त्यांचं घर होतं ते मुंबईतल्या एका महागड्या वस्तीमध्ये होतं आणि उद्या जरी पगडी सिस्टमची जुनी बिल्डिंग डेव्हलपला गेली असती तर त्या ठिकाणी नवीन रूमचा करोडोंच्या वरती फायदा रामराव आणि शामरावला मिळणार होता. म्हणजे नवीन बिल्डिंग उभी राहिली असती तर करोडोंच्या भावात त्या रूमची किंमत त्यांना मिळणार होती. तुम्हा दोघा भावांचा खोलीचा विषय संपुष्टात आणायचा असेल तर तुम्हाला मला २० लाखांपर्यंत रक्कम द्या तर मी कोर्टातून केस मागे घेतो असा पर्याय रामराव आणि शामराव पुढे ठेवण्यात आला. रामराव आणि शामराव यांना तो पर्याय योग्य वाटला कारण केस कुठपर्यंत कोर्टात चालेल याचा नेम नव्हता. जर हे कोर्टात प्रकरण अडकलं असतं तर त्यांच्या नावाची फाईल बिल्डरकडे जाणार नव्हती आणि पुढे जे नुकसान होणार होतं ते कधी न भरून निघणार होतं. एवढे दिवस शामराव त्या घरामध्ये राहत होते. म्हणून त्यांनी घर मालकाचा खोलीचा विषय संपुष्टात आणून केस मिटवायचं ठरवलं. अशी मुंबई शहरांमध्ये पागडी पद्धतीने असलेल्या घर मालक आणि भाडोत्री यांच्यामध्ये अनेक प्रकरण ही वादाची झालेली आहेत.
(सत्यघटनेवर आधारित)