Tuesday, May 21, 2024
Homeसाप्ताहिककोलाजCrime : पैशांसाठी खोटे आरोप करून फसवणूक

Crime : पैशांसाठी खोटे आरोप करून फसवणूक

  • क्राइम : अॅड. रिया करंजकर

सभ्य लोक पोलीस स्टेशन, कोर्ट या गोष्टींना घाबरतात हे सतीशला चांगल्याच प्रकारे माहीत होतं व पैशांसाठी मुलीच्या चारित्र्याचा विचार न करता एका सभ्य घरातील मुलाला फसवण्याचा प्रयत्न केला व त्यात तो यशस्वीही झाला.

सतीश हा भाड्याने राहायला आला होता. तीन मुली, १ मुलगा व पत्नी असा त्याचा परिवार होता. सतीश हा राजकारणातील एक कार्यकर्ता होता. अनेक वर्षे राजकारणातील कार्यकर्ता असल्यामुळे त्याला पोलीस स्टेशन व इतर सर्व काही बारकावे माहीत होते. कोणाला कसे मूर्ख बनवायचे आणि पैसे वसूल करायचे या गोष्टीत तो तरबेज होता. घरातून बाहेर पडल्यानंतर घरात येईपर्यंत दोन-तीन हजार रुपये घेऊनच घरी यायचं, असं त्याचं दररोज टार्गेट असायचं. जिथे भाड्याने जात असे तिथे ते लोक भांडण करत असत. एवढेच नाही त्याचे घरमालक होते, त्यांच्याशी ते लोक भांडायचे. सतीशची बायको एवढी भयानक बाई होती की एखाद्याबरोबर भांडण करायला गेली की, स्वतःच्या अंगावरचे कपडे फाडायची आणि याने माझे कपडे फाडले, असा आरोप करायची. म्हणून आजूबाजूचे घरमालक हे ज्या मालकाने भाडेकरू ठेवलेला आहे, त्याला भाडोत्री खाली करायला लावायचे. कधी कधी तर सतीश घर मालकाचे भाडे देत नसायचा आणि मालकावरच नको नको ते आरोप करायचा. सतीशला एकदा फार मोठ्या रकमेची गरज होती. कुठून उभी करायची हे त्याला समजत नव्हतं. त्याच्या लक्षात आलं की, त्याची मोठी मुलगी ही शेजारी असलेल्या मुलाबरोबर बोलत आहे. आणि त्याचवेळी त्याने आपल्या सैतानी डोक्यात एक कल्पना शिजवली. त्याने आपल्या मुलीला आणि पत्नीला विश्वासात घेऊन, तो तुझा कशा प्रकारचा मित्र आहे, असं आपल्या मुलीला विचारलं. तेव्हा तिने आम्ही एकाच शाळेत आहोत त्याच्यामुळे शाळेतील मैत्री आहे एवढेच त्या मुलीने सांगितलं. सतीशने आपल्या मुलीला सांगितलं की, आपल्याला पैशांची गरज आहे जे मी बोलेन त्याला तू ‘हो’ला हो दे.

एक दिवस मुलगी रडत रडत बाहेरून कुठून तरी आली. सतीशच्या बायकोने अगोदरच शेजारच्या काही दोन-तीन बायकांना घरात बोलवलं होतं गप्पा मारण्यासाठी. मुलगी रडत आल्यावर रडतेस का? काय झालं म्हणून विचारायला सुरुवात केली. रडता रडता माझ्यावर अत्याचार झाला, असं ती त्या बायकांना सांगू लागली. आलेल्या बायकांना या गोष्टीचा धक्का बसला आणि हे ऐकून सतीशची बायको मोठ्या मोठ्याने रडायला लागली. आता बघता बघता ही गोष्ट वाऱ्यासारखी त्या चाळीत पसरली. सतीशला समजल्यावर तो तिथे आला आणि मोठ्याने ओरडू लागला, मी त्याला अशी शिक्षा करणार मी त्याला तसं करणार आणि त्या मुलीने शेजारी असलेल्या मित्रावर अत्याचार केल्याचा आरोप केला.

त्या मुलालाही नेमकं काय झालं ते समजेना आणि त्याच्या घरातल्या लोकांना तर फार मोठा धक्काच होता. आपला मुलगा असं काहीच करणार नाही, याची कल्पना त्या मुलाच्या घरातल्या लोकांना होती. सतीश बोलायला लागला मी आता पोलीस स्टेशनला जाणार कंप्लेंट करणार आणि तुमच्या मुलाला सात-आठ वर्षे जेलमध्ये पाठवणार अशा धमक्या तो त्यांच्या कुटुंबाला देऊ लागला आणि तिथूनच वेगवेगळ्या राजकारणातील लोकांना फोन फिरवू लागला. सतीशच्या ओळखीची चार माणसे आली. ती अगोदरच त्याने प्लॅन केलेली होती. त्या मुलाच्या वडिलांना बोलू लागली, बघा पोलीस स्टेशनला गेलात, तर फार मोठे प्रकरण होईल व तुमचा मुलगा आत जाईल तरी तेच काहीतरी सेटलमेंट करून टाका.

मुलाच्या घरातले लोक खूप घाबरले. आलेल्या लोकांनी सतीशला समजावण्याचं नाटक केलं. आपण प्रकरण मिटवूया असे ते सतीशला सांगू लागले. सतीश तिथेच प्रकरण मिटवायला तयार झाला आणि त्याने मुलाच्या वडिलांकडे आठ लाख रुपयांची मागणी केली. मुलाचे कुटुंब चाळीत राहणारे होते. त्यांच्याकडे ८ लाख रुपये नव्हते. सतीश बोलू लागला मुलाच्या आयुष्यापेक्षा तुम्हाला पैसे महत्त्वाचे वाटतात का? मध्यस्थी आलेल्या लोकांनी ५ लाखापर्यंत सेटलमेंट केली. मुलगा सांगत होता, मी काहीच केलेलं नाहीये. पण हे प्रकरण असं होतं की मुलांच्या वडिलांना वाटलं की आपल्या मुलाला यात फसवलं जाईल म्हणून त्यांनी ५ लाख रुपये सतीशला दिले आणि आपल्या मुलाला कुठे फसवणार नाही असं सतीशकडून लिहून घेतले व त्याच्या मुलीकडूनही. चाळीतल्या लोकांना माहीत होतं तो मुलगा वाईट वृत्तीचा नव्हता, पण सतीश आणि त्याच्या मुलीने केलेले आरोप खरोखर भयानक होते. ५ लाख रुपये घेऊन सतीश दुसरीकडे राहायला गेला. पैशासाठी त्यांनी आपल्या मुलीच्या चारित्र्याचा विचार केला नाही आणि एका सभ्य घरातील मुलाला फसवण्याचा सतीशने प्रयत्न केला. आपला मुलगा कुठे फसला जाऊ नये, या काळजीपोटी मुलाच्या वडिलांनी पैसे दिले.

कायद्याचं ज्ञान नसल्यामुळे अशी साधी सरळ लोक क्रिमिनल वृत्तीच्या लोकांकडून फसवली जातात आणि ही क्रिमिनल वृत्तीची लोक साध्या सरळ लोकांकडून आपला फायदा करून घेतात. नाही तर आपली ओळख वरपर्यंत आहे हे दाखवून त्यांना आपल्या जाळ्यात फसवतात.

आपली बाजू सत्याची असेल, तर कायदेशीर लढाई लढली पाहिजे म्हणजे जो विनाकारण आपल्याला जाळ्यात फसवतो, तो अलगद त्या जाळ्यामध्ये स्वतःच फसला जाईल.

(सत्यघटनेवर आधारित)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -