नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधितांचा दैनंदिन आकडा दिवसागणिक वाढतच आहे. गेल्या २४ तासांत ५ हजार ३३५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशातच देशातील सक्रिय रुग्णांची संख्या वाढून २५ हजार ५८७ वर पोहोचली आहे.
आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, कालच्या तुलनेत आजचा आकडा तब्बल २० टक्क्यांनी अधिक असून गेल्या २४ तासांत नोंदवण्यात आलेला नव्या कोरोनाबाधितांचा आकडा गेल्या ६ महिन्यांतील सर्वाधिक आकडा आहे.
India records 5,335 new cases of Covid19 in the last 24 hours; Active caseload stands at 25,587
— ANI (@ANI) April 6, 2023
देशात सध्या दिल्ली, महाराष्ट्र, हरियाणा, तामिळनाडू, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकात सध्या सर्वाधिक प्रादुर्भाव असल्याचे पाहायला मिळत आहे.
कर्नाटकमध्ये दोन, महाराष्ट्रात दोन, पंजाबमध्ये एक, केरळमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात दैनिक सकारात्मकता दर ३.३२ टक्के आहे. तसेच, गेल्या २४ तासांत २ हजार ८२६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
दरम्यान, बुधवारी देशात ४ हजार ४३५ रुग्णांची नोंद करण्यात आली होती. सध्या देशातील आतापर्यंतच्या एकूण कोरोनाबाधितांची आकडेवारी ४ कोटी ४७ लाख ३३ हजार ७१९ वर पोहोचली आहे.
महाराष्ट्रात दोन जणांचा मृत्यू
महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर ५६९ जण पॉझिटिव्ह आले आहेत. मात्र, काल राज्यात ७११ जण पॉझिटिव्ह आले होते. आता राज्यातील कोविड-१९ चे एकूण रुग्णसंख्या ८१ लाख ४६ हजार ८७० वर पोहोचली आहे. तर मृतांची संख्या १ लाख ४८ हजार ४५१ वर पोहोचली आहे.
आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मुंबईत आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत २११ नवे रुग्ण आणि एक मृत्यू नोंदवला गेला, तर दुसरा मृत्यू पुण्यात झाला. महाराष्ट्रातील कोरोना व्हायरसचा मृत्यू दर १.८२ टक्के आहे.