अवकाळी पावसामुळे गव्हाचे पीक आडवे
औरंगाबाद : अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. मात्र त्यानंतर आता रब्बीच्या हंगामात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह औरंगाबाद आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. ज्यामुळे रब्बीच्या पीकांना मोठा फटका बसला आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मराठवाड्यात पुढील पाच दिवस किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नसून, २५ जानेवारी रोजी बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिशय हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच मराठवाड्यात २७ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान देखील तुरळक ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे.
गव्हाच्या पीकांना सर्वाधिक फटका बसला असून, औरंगाबाद जिल्ह्यात अनेक ठिकाणी गव्हाचे पीक आडवे पडली आहेत. प्लॉटचे प्लॉट आडवे झाल्याने पुन्हा शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळत आहे. त्यातच आज पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तसेच झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याची मागणी देखील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.