गैरवर्तन केल्याप्रकरणी आयसीसीने ठोठावला दंड
नवी दिल्ली (वृत्तसंस्था): भारताच्या बांगलादेश दौऱ्यातील शेवटचा एकदिवसीय सामना खूप वादग्रस्त ठरला. फलंदाजीदरम्यान बाद झाल्यावर कर्णधार हरमनप्रीत कौर भडकली. अंपायरच्या चुकीच्या निर्णयावर संताप व्यक्त केला. पण तिचे हे वागणे तिला भोवले असून गैरवर्तन केल्याप्रकरणी आयसीसीने दंड ठोठावला आहे. स्टंपवर बॅट फेकून मारणे कर्णधार हरमनप्रीत कौरला चांगलेच महागात पडले आहे. अंपायरशी हुज्जत घातल्याप्रकरणी तिला आयसीसीने सक्त ताकीदही दिली आहे. हरमनप्रीत कौरच्या बाबतीत दिलेला पायचीतचा निर्णय हा वादाचा विषय ठरला आहे. त्यानंतर तिने सामन्याच्या शेवटी प्रेझेंटेशच्या वेळीही वादग्रस्त विधान केले. आता हरमनप्रीत कौरला तिच्या मॅच फीच्या ७५ टक्के दंड भरावा लागेल. त्यासोबतच दोन गुणही कापले जाणार आहेत.
बांगलादेश सोबतच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघ विजयी होऊ शकला नाही, दोन्ही संघात सामना टाय झाला. भारतीय महिला संघाला एकदिवसीय मालिका जिंकण्यात अपयश आले. शेवटच्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार हमरनप्रीत कौर नाराज झाली होती. अंपायरने आऊट दिल्यानंतर हरमनप्रीतने बॅट स्टंपवर आदळली. त्याचवेळी, सामना संपल्यानंतर तिने प्रेझेंटेशन दरम्यान एक विधानही केले की, ‘पुढच्या वेळी बांगलादेशला येण्यापूर्वी संघालाही अशा अंपायरिंगला सामोरे जावे लागेल हे आम्ही लक्षात ठेवू आणि तशी मानसिक तयारी करू’. हरमनच्या या प्रतिक्रियेनंतर आयसीसीने तिला दंड ठोठावला आहे. तिला मॅच फीच्या ७५ टक्के दंड भरावा लागेल. यासोबतच तिचे दोन गुणही वजा केले जातील. त्याशिवाय आयसीसी हरमनप्रीतवर एक कसोटी किंवा दोन मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी बंदी घालू शकते. हरमनप्रीतला तिच्या या कृत्याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे. जर कोणत्याही खेळाडूने कोणत्याही सामन्याच्या अधिकाऱ्याविषयी सार्वजनिकपणे टीका केली किंवा त्याची बदनामी केली तर तो आयसीसीच्या नियमानुसार आचारसंहितेचा भंग मानला जातो.
हरमनप्रीत कौरवर बांगलादेशच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार निगार सुलतानाने टीका केली आहे. त्याचवेळी भारतीय महिला फलंदाज स्मृती मंधाना आपल्या कर्णधाराच्या बचावात मैदानात उतरली आहे. बांगलादेश दौऱ्यातील शेवटच्या सामन्याबद्दल जर बोलायचे झाले तर या सामन्यात भारतीय महिला खेळाडूंनी चांगली कामगिरी करूनही त्यांना मालिका जिंकता आली नाही. परिणामी सामना बरोबरीत सुटला. या सामन्यात स्मृती मंधानाने ५९, हरलीन देओलने ७७ धावा केल्या. तर हरमनप्रीत कौर १४ धावा काढून बाद झाली.