Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रपालघरपालघरमध्ये बुलेट ट्रेन सुसाट...!

पालघरमध्ये बुलेट ट्रेन सुसाट…!

संदीप जाधव

बोईसर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या भूसंपादनाच्या कामाने पालघर जिल्ह्यात चांगलाच वेग घेतला आहे. पालघर जिल्ह्यात जवळपास ६० टक्के भूसंपादनाचे काम पूर्ण झाले असून उर्वरीत जागेच्या संपादनाचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करून प्रत्यक्ष कामांना सुरुवात करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यात बुलेट ट्रेनच्या कामाने सुसाट वेग घेतल्याचे चित्र आहे.

मुंबई ते अहमदाबाद दरम्यानचे ५०८ किमीचे अंतर अवघ्या २ तासांत पार करण्याची क्षमता बुलेट ट्रेनमध्ये आहे. पंतप्रधान मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला हा प्रकल्प राज्यात महाराष्ट्रात सत्ता बदल होऊन शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर येताच बुलेट ट्रेन प्रकल्पातील सर्व अडचणी तातडीने दूर करून हा प्रकल्प २०२७ पर्यंत नियोजित वेळेत पूर्ण करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. प्रकल्पातील सर्वात मोठी अडचण असलेल्या भूसंपादनाच्या कामाने पालघर जिल्ह्यात वेग घेतला असून जिल्हा प्रशासनाकडून ६० टक्क्यांच्या वर जमिनीचे संपादन पूर्ण करण्यात आले आहे. पालघर जिल्ह्यातील वसई, पालघर, डहाणू आणि तलासरी या तालुक्यातून बुलेट ट्रेनचा मार्ग जात असून विरार आणि बोईसर या ठिकाणी स्टेशन्स असणार आहेत.

जिल्ह्यात बुलेट ट्रेन मार्गासाठी एकूण २१८ हेक्टर जागेची गरज लागणार असून यापैकी आतापर्यंत १०० हेक्टर खासगी आणि २७ हेक्टर सरकारी अशा एकूण १२७ हेक्टर जागेचे संपादन पूर्ण करण्यात आले आहे, तर बाकी ९१ हेक्टर जागेचे संपादन करण्याची प्रक्रिया पालघर जिल्हा प्रशासनाकडून वेगाने केली जात आहे. २०१७ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाची घोषणा करून २०२३ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सुरुवातीपासूनच पालघर जिल्ह्यातील शेतकरी आणि संघटनांचा या प्रकल्पास प्रखर विरोध होऊ लागल्याने बुलेट ट्रेनच्या भूसंपादनास ब्रेक लागला होता. या मार्गासाठी भूसंपादनाचे अनेक अडथळे पार करत आत्ता खऱ्या अर्थाने बुलेट ट्रेनच्या कामाने वेग घेतला आहे. ज्या भागातून हा मार्ग जात आहे तेथील जागेला आता सोन्याच्या भाव आला असून या भागात अनेक मोठे उद्योगधंदे, पायाभूत प्रकल्प, होणार असल्याने भविष्यात पालघर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला मोठी चालना मिळणार आहे.

जिल्ह्यातील भू-संपादनाची सद्यस्थिती

पालघर जिल्ह्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गासाठी वसई तालुक्यात एकूण ३७ हेक्टर खासगी जागेपैकी २१ हेक्टर जागेचे संपादन पूर्ण झाले असून १६ हेक्टर जागेचे संपादन शिल्लक आहे. पालघर तालुक्यात ७० हेक्टर खासगी जागा बाधित होणार असून यापैकी २५ हेक्टर जागा संपादीत करण्यात आली आहे. त्यापैकी ४५ हेक्टर जागेचे संपादन अपूर्ण आहे. डहाणू तालुक्यातील ५१ हेक्टर खासगी जागेपैकी एकूण ३४ हेक्टर जागेचे भूसंपादन पूर्ण झाले असून १७ हेक्टर जागेचे संपादन बाकी आहे.

तलासरी व डहाणू तालुक्यातील बुलेट ट्रेनसाठी संपादित होणाऱ्या खासगी जमिनींच्या मालकांनी भूसंपादनाबाबत सकारात्मक भूमिका घेतली असून स्वतःहून सहकार्य करणाऱ्या बाधित जमीन मालकांना शासनाकडून घोषित ४ पट मोबदल्या ऐवजी आणखी १ पट वाढीव असा एकूण ५ पट मोबदला देण्यात येत आहे. त्यामुळे जमीन संपादित झालेल्या शेतकऱ्यांनी आपले कागदपत्रे कार्यालयात जमा करून मोबदला घ्यावा.
– सुरेंद्र नवले उपजिल्हाधिकारी, भूसंपादन, डहाणू-तलासरी

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -