Thursday, May 2, 2024
HomeदेशChhattisgarh CM : भाजपने छत्तीसगडमध्ये आदिवासी नेत्याला दिले मुख्यमंत्रीपद

Chhattisgarh CM : भाजपने छत्तीसगडमध्ये आदिवासी नेत्याला दिले मुख्यमंत्रीपद

अनेक दिवसांपासून होता सस्पेन्स; कोणाची नावे होती चर्चेत?

रायपूर : देशातील चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकींमध्ये (Assembly Elections) छत्तीसगड, राजस्थान आणि मध्यप्रदेश या तीन राज्यांत भाजपाचा (BJP) दणदणीत विजय झाला. तर तेलंगणामध्ये काँग्रेसचा (Congress) विजय झाला. तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून रेवंथ रेड्डी यांनी शपथ घेतली. मात्र, भाजपकडून मुख्यमंत्र्यांचा सस्पेन्स कायम होता. नुकताच छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदाचा पेच सुटला आहे. भाजप विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत आज छत्तीसगडची कमान विष्णू देव साय (Vishnu Deo Sai) यांच्याकडे सोपवण्यात आली.

विष्णू देव साय हे आदिवासी नेते आणि राज्यातील भाजपचे महत्त्वाचे नाव आहे. छत्तीसगड राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवला आणि भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचा पराभव करून राज्य परत घेतले. २०१८ मध्ये काँग्रेसने विजय मिळवण्यापूर्वी राज्यात भाजपची १५ वर्षांची सत्ता होती. छत्तीसगडमध्ये भाजप विजयी झाल्यामुळे काँग्रेसला राज्य राखता आले नाही. ९० सदस्यीय विधानसभेच्या सभागृहात, काँग्रेसने जिंकलेल्या ३५ जागांच्या तुलनेत भाजपने ५४ जागा जिंकून आरामात विजय मिळवला.

कोण आहेत विष्णू देव साय?

आदिवासी समाजातील विष्णू देव साय यांनी १९८० मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. विष्णू देव हे छत्तीसगडच्या कुंकुरी विधानसभेतील आहेत. राज्यात आदिवासी समाजाची लोकसंख्या सर्वाधिक आहे. आदिवासी चेहऱ्यावर भाजप बाजी मारेल अशी अटकळ होती, ती खरी ठरली. विष्णू देव साई २०२० मध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले. ते खासदार आणि केंद्रीय मंत्री राहिले आहेत. याशिवाय ते आरएसएस आणि माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांच्याही जवळचे आहेत.

विष्णू देव साय यांचा जन्म २१ फेब्रुवारी १९६४ रोजी जशपूर येथे शेतकरी कुटुंबात झाला. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात ते केंद्रीय पोलाद राज्यमंत्री होते. १६व्या लोकसभेत छत्तीसगडमधील रायगडमधून विजयी होऊन ते खासदार झाले. १९९०-९८ मध्ये ते दोनदा आमदार होते. यानंतर ते १९९९ ते २०१४ पर्यंत खासदार झाले. खासदार असताना त्यांनी अनेक समित्या आणि पदे भूषवली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि १९८० मध्ये बगिया येथून सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध जिंकली होती. यानंतर १९९० मध्ये पहिल्यांदा त्यांनी आपल्या मालमत्तेचा काही भाग विकून आमदारकीची निवडणूक लढवली आणि विजयी झाले.

मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत कोण होते आघाडीवर?

भाजपाने छत्तीसगड राज्यात मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराशिवाय निवडणूक लढवली, त्यामुळे पक्ष नवीन चेहऱ्यांसोबत जाणार असल्याच्या कयासांना बळ मिळाले. मात्र, रमण सिंग, रामविचार नेताम, अरुण साओ, ओपी चौधरी, सरोज पांडे आणि विष्णू देव साई हे रिंगणात आघाडीवर होते. माजी मुख्यमंत्री आणि पक्षाचे दिग्गज नेते रमणसिंग यांची या पदासाठी निवड न केल्यास भाजप ओबीसी किंवा आदिवासी उमेदवारासोबत जाईल, असा अंदाजही वर्तवला जात होता. हा अंदाज खरा ठरला असून विष्णू देव साई यांची निवड करण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -